गेल्या सहा वर्षांत पहिल्यांदाच टी-२० मालिकेत वेस्ट इंडिजने भारताला पराभूत केले आहे. वेस्ट इंडिजच्या रोमारिओ शेफर्ड आणि ब्रँडन किंग यांच्या अभूतपूर्व खेळीमुळे त्यांनी भारताचा आठ विकेट्स राखून विजय मिळवला आणि पाच सामन्यांची ही मालिका ३-२ अशा फरकाने जिंकली.
फ्लोरिडा येथील सेंट्रल ब्रोवार्ड स्टेडियममध्ये रंगलेल्या या सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्या याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल ही सलामीवीरांची जोडी दमदार कामगिरी करण्यात अपयशी ठरली. शुभमन गिल आणि जयस्वाल झटपट बाद झाले. जयस्वाल चार चेंडूंत केवळ पाच धावा करू शकला तर, गिल नऊ धावा करून पायचीत झाला. त्यामुळे भारताची अवस्था दोन बाद १७ अशी झाली होती.
भारताचा उपकर्णधार सूर्यकुमार यादव याने तिलक कुमारसोबत खेळपट्टीवर ठाण मांडून ४९ धावांची भागिदारी केली. त्याने १८ चेंडूंत २७ धावा केल्या. यष्टीरक्षक संजू सॅमसन याने टी२० सामन्यात सहा हजार धावांचा पल्ला गाठला. मात्र पुन्हा एकदा चांगली कामगिरी करण्यात तो अपयशी ठरला. त्याने नऊ चेंडूंत अवघ्या १३ धावा केल्या. सॅमसन बाद झाल्यानंतर सूर्यकुमारने स्वत:च्या हातात खेळाची सूत्रे घेतली आणि टी-२०मधील १५वे अर्धशतक फटकावले. पावसाने खेळात व्यत्यय आणल्याने खेळ थांबवावा लागला. त्यानंतर रोमारियो शेफर्डच्या गोलंदाजीवर पांड्या बाद झाला. पांड्याने १८ चेंडूंत १४ धावा केल्या. त्यानंतर पुढच्याच षटकात सूर्यकुमारही पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने ४५ चेंडूंमध्ये ६१ धावा केल्या. त्याने चार चौकार आणि तीन षटकार खेचले. अक्सर पटेल याने १३ चेंडूंमध्ये १० तर, अर्शदीप सिंग केवळ आठ धावा करू शकला. त्यामुळे भारताचा खेळ अवघ्या १६५ धावांमध्ये आटोपला.
हे ही वाचा:
माझ्या पुतण्याला भेटायला काय हरकत आहे?
सुशील कुमारचे तिहार जेलमध्ये आत्मसमर्पण
भूमाफिया लेडी डॉन करीना शेखसह तिघांवर गुन्हा
रोहित शर्मा पोहचला तिरुपती बालाजीच्या दर्शनाला
वेस्ट इंडिजच्या बाजूने शेफर्ड याने ३१ धावांच्या मोबदल्यात चार विकेट घेतल्या. तर, जेसन होल्डर आणि हुसैन याने प्रत्येकी दोन गडी बाद केले. त्यानंतर वेस्ट इंडिजचा संघ मैदानात उतरला. कायल मेयर्स याने पांड्या याच्या पहिल्याच षटकात एक षटकार आणि एक चौकार लगावून दमदार सुरुवात केली. मात्र अर्शदीपने पुढच्याच षटकात त्याला बाद केले. त्यानंतर मैदानात उतरलेल्या निकोलस पूरन याने तीन षटकार खेचले. त्यातील एक षटकार अर्शदीप तर दोन पांड्याच्या षटकात खेचले. त्यानंतर ब्रँडन किंग आणि पूरन यांच्या जोडीने मैदानावर जम बसवला. या दोघांनी सुमारे १० षटके किल्ला लढवला. या वेळीही पावसाचा अधूनमधून व्यत्यय जाणवत होता. त्यामुळे काहीवेळा सामना थांबवावा लागला.
पूरन आणि किंग यांनी १०५ धावांची खेळी केल्याने वेस्ट इंडिजची स्थिती मजबूत झाली होती. दोघांनीही अर्धशतके पूर्ण केली आणि भारताच्या हातातून सामना निसटू लागला. पूरन याला याआधी याच मालिकेत दोनदा कुलदीप यादव याने बाद केले होते. मात्र या सामन्यात कुलदीप यादवला एकही विकेट मिळाली नाही. त्याने चार षटकांत १८ धावा दिल्या.
वीज कोळण्याच्या भीतीने पुन्हा सामना थांबवावा लागला. त्यानंतर तिलक वर्माकडे गोलंदाजीची सूत्रे देण्यात आली. त्याने पहिल्याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर पूरनला बाद केले. मात्र तोपर्यंत भारताच्या हातातून सामना निसटून गेला होता. त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या शई होप याने किंगच्या साथीने लक्ष्य पार केले. किंग हा ५५ चेंडूंत ८५ धावा करून नाबाद राहिला. त्याने पाच चौकार आणि सहा षटकार खेचले. तर, निर्णायक धाव घेऊन विजय मिळवणाऱ्या होपने एका षटकारासह १३ चेंडूमध्ये २२ धावा केल्या आणि भारतावर ३-२मने मात करून मालिकाविजय मिळवला.