छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक २०२६ च्या निकालात भारतीय जनता पार्टीने जोरदार कामगिरी करत आघाडी घेतली असून शिवसेनाला मोठा धक्का बसला आहे. निवडणूक निकाल जाहीर होताच भाजपच्या प्रचार कार्यालयात जल्लोषाचे वातावरण होते. शहरातील मतदारांनी विकास, पाणीपुरवठा, रस्ते, सुरक्षा आणि पारदर्शक कारभार या मुद्द्यांवर कौल दिल्याचे भाजप नेत्यांनी स्पष्ट केले.
११४ सदस्यांच्या महापालिकेत बहुमतासाठी ५८ जागांची गरज असताना प्राथमिक आकडेवारीनुसार भाजप ५५ ते ५७ जागांवर आघाडीवर आहे. MIM ने सुमारे २३ ते २५ जागांवर आघाडी मिळवत आपली ताकद कायम ठेवली आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांना मिळून २० ते २२ जागा, तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अपक्षांना मिळून १० ते १२ जागा मिळाल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजप बहुमताच्या अगदी जवळ पोहोचली असून महापौरपदावर दावा मजबूत झाला आहे.
हे ही वाचा:
संजय राऊतांना आवाज देणारे नवनाथ बन विजयी
पुणे–पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा पवारांना धक्का
वैभव सूर्यवंशीने अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये रचला इतिहास
AI क्षेत्रामुळे आशियाई शेअर्समध्ये तेजी
निकालानंतर केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी सांगितले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला ‘ना बाण ना खान, राखू भगव्याची शान’ हा संदेश जनतेपर्यंत पोहोचला. पारदर्शक प्रशासन आणि विकासावर लोकांनी विश्वास दाखवला असून भाजपचाच महापौर होईल.” त्यांनी पुढील तीन महिन्यांत शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था सुधारण्याची ग्वाही दिली.
आमदार संजय केनेकर म्हणाले की, शहराचा सर्वांगीण विकास करताना जुन्या सत्ताकारणाच्या खुणा पुसल्या जातील. भाजप जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी बूथनिहाय नियोजन, संघटनात्मक ताकद आणि मुद्देसूद प्रचारामुळे हा निकाल लागल्याचे सांगितले. एकूणच, छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील हा निकाल राजकीय समीकरणे बदलणारा ठरला असून पुढील सत्तास्थापनेबाबत शहराचे लक्ष भाजपकडे लागले आहे.







