हुजुराबाद विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीच्या २१व्या फेरीनंतर भाजपाचे उमेदवार इटाला राजेंद्र यांनी २२,५२२ मतांची आघाडी घेत आपला विजय निश्चित केला आहे. अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेल्या शेवटच्या फेरीच्या निकालासह, भाजपला १,०१,९७४ मते मिळाली आहेत. त्यांच्याविरुद्ध जवळचे प्रतिस्पर्धी आणि टीआरएस उमेदवार गेल्लू श्रीनिवास यादव यांना ७९,४५२ मते मिळाली आहेत. काँग्रेसला आतापर्यंत २,९०५ मते मिळाली आहेत.
हुजूराबाद विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी करीमनगर येथील एसआरआर शासकीय पदवी महाविद्यालयात सकाळी ८ वाजता सुरू झाली. २२ फेऱ्यांमध्ये मतमोजणी होत आहे.
इटाला राजेंद्र यांचे अभिनंदन करताना केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी म्हणाले की, टीआरएसने राज्य सरकारच्या यंत्रणेचा गैरवापर करूनही जनता योग्य उमेदवार आणि योग्य पक्षाच्या पाठीशी उभी आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बंडी संजय यांनी यापूर्वी इटाला राजेंद्र पोटनिवडणुकीत प्रचंड बहुमताने विजयी होत असल्याचा विश्वास व्यक्त केला होता. “निकाल टीआरएसच्या अहंकार आणि पैशाच्या शक्तीसाठी योग्य धडा असेल.” असं ते म्हणाले. जनतेचा मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यावरील “विश्वास” उडाला आहे.
हे ही वाचा:
‘पंजाब लोक काँग्रेस’सह कॅप्टन मैदानात
भारतीयांना इस्रायलची मैत्री बहुमूल्य
जगाचा दबाव झुगारून भारताने ठरवले २०७० चे लक्ष्य
निवडणुकीच्या निकालांवरील आपल्या पहिल्या प्रतिक्रियेत, टीआरएस पक्षाचे कार्याध्यक्ष केटी रामाराव यांनी पक्ष कार्यकर्त्यांना “भविष्यातील लढाईत पुढे जाण्यासाठी अधिक दृढ संकल्पाने काम करण्याचे आवाहन केले.”
दरम्यान, पराभव मान्य करत तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनुमुला रेवंत रेड्डी यांनी पक्षाच्या पराभवाची संपूर्ण जबाबदारी घेतली. त्यांनी पत्रकारांना सांगितले की, टीआरएस सरकारच्या कुशासनाच्या विरोधात आणि लोकहितासाठी लढण्यासाठी मी काँग्रेस केडरचे नेतृत्व करणार आहे.