पेट्रोल, डिझेलवर शिवसेनेने पुकारलेल्या आंदोलनावर महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. “सेनेने मोर्चे काढण्याची नौटंकी करू नये, राज्य सरकारने पेट्रोल डिझेलवरचे टॅक्सेस कमी करावेत आणि भाववाढ नियंत्रणात आणावी.” असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात केले.
“मागच्या काळात आम्ही सरकारमध्ये होतो, त्यावेळीही पेट्रोल डिझेल दरवाढ झाली होती. त्यावेळी मी आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी पेट्रोल डिझेलवरचा राज्याचा कर कमी केला होता आणि पेट्रोल डिझेलचे दर 2 रुपयांनी कमी केले होते. आताच्या सरकारने पेट्रोल डिझेलवर कर कमी करावा आणि पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करुन दाखवावेत. उगीचच मोर्चे काढण्याची नौटंकी करु नये” असा हल्ला फडणवीसांनी शिवसेनेवर चढवला.
शिवसेनेने पेट्रोलचे भाव वाढत असल्यामुळे ५ फेब्रुवारीला राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णययावर देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केले आहे.
याचबरोबर शार्जील उस्मानीला सरकारने अटक का केलेली नाही? असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी केला. शार्जील उस्मानी याने एल्गार परिषदेच्या कार्यक्रमात “हिंदू समाज सडलेला आहे.” असे प्रक्षोभक विधान केले होते. ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे दैनिक चालवणाऱ्या शिवसेनेने अशा व्यक्तीला अटक का केली नाही? असा सवाल हिंदू समाजाकडून उपस्थित केला जात आहे.