१५ जून रोजी रीता आणि तिच्या सहकारी शेतकऱ्यांनी जेवर येथील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिल्यांदाच विमानप्रवास केला. विमान ढगांमध्ये झेपावत असताना प्रवासी खिडकीतून खाली पाहत होते आणि खाली दिसणाऱ्या कोणत्या जमिनीचा तुकडा पूर्वी त्यांचा होता याचा अंदाज बांधत होते. आज त्या जमिनीवर तब्बल ३३०० एकर क्षेत्रफळाचा विशाल विमानतळ उभा आहे.
खोरी गावातील रीता म्हणाली, “हा माझा पहिलाच विमानप्रवास असल्यामुळे मला सुरुवातीला भीती वाटत होती. पण विमान उडू लागल्यानंतर खूप छान वाटले. ढग दिसत होते, घरे लहान होत गेली आणि नंतर दिसेनाशी झाली. माझ्यासोबतच्या इतर महिलाही तितक्याच आश्चर्यचकित झाल्या होत्या.”
रीतासोबत आसपासच्या गावांतील आणखी २८ महिला होत्या. त्यापैकी अनेकांनी आयुष्यात प्रथमच विमानप्रवास केला. विमानात शेतकरी घोषणाबाजी करत होते, “विकास की उड़ान… योगी सरकार जिंदाबाद!” हेच शेतकरी काही वर्षांपूर्वी त्या जमिनीवर गहू आणि भाताची शेती करत होते, जिथे आज विमानतळ उभा आहे.
हे ही वाचा:
मुंबईत ‘पांढऱ्या पट्ट्यां’चा वाद पेटला; मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
बँक ऑफ जपानने व्याजदर १% पर्यंत वाढवले
शेअर बाजारात उसळी; सेन्सेक्समध्ये ५४४ अंकांची झेप
स्लोव्हाकियाकडून पंतप्रधान मोदींना सर्वोच्च नागरी सन्मान
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे आठवडाभरापूर्वी त्यांना जेवरचे आमदार धीरेंद्र सिंह भाटी यांनी सांगितले होते की ते नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पहिल्या उड्डाणाचे प्रवासी असतील. सुमारे १७० शेतकरी या विमानातून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्यासाठी गेले. विमानतळ प्रशासनानुसार, हे इंडिगोचे विमान होते. ते सकाळी ७.१२ वाजता लखनौच्या चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करून ७.५८ वाजता जेवर येथे उतरले. त्याच दिवशी शेतकरी परतीच्या विमानाने पुन्हा नोएडा विमानतळावर आले.
५० वर्षीय रीता म्हणाली, “आम्ही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे विकासासाठी आभार मानले. आमच्या भागाच्या आणि देशाच्या विकासासाठी आम्ही आमची जमीन दिली याचा आम्हाला अभिमान आहे. या विमानात जेवरचे आमदार धीरेंद्र सिंह, तसेच यमुना एक्सप्रेसवे औद्योगिक विकास प्राधिकरणाचे अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी राकेश सिंह, अतिरिक्त सीईओ शैलेन्द्र भाटिया आणि माजी जेवर उपजिल्हाधिकारी अभय सिंह हेही उपस्थित होते.
राम मोहन नायडू यांनी उद्घाटनावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले की हा विमानतळ देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी प्रमुख केंद्र (हब) म्हणून विकसित केला जाईल. पहिल्या व्यावसायिक उड्डाणाला हिरवा झेंडा दाखवण्यापूर्वी त्यांनी केक कापला आणि प्रवाशांना स्मरणिकेच्या स्वरूपातील विमानतिकिटे दिली.
ते म्हणाले, “या विमानतळासाठी जमीन देणारे शेतकरी पहिल्या उड्डाणाने लखनौला जात आहेत. तेथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत विशेष संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पुढे ते म्हणाले, “हा विमानतळ देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही प्रकारच्या सेवांसाठी केंद्र म्हणून काम करेल. पूर्ण झाल्यानंतर जेवर विमानतळ आशियातील सर्वात मोठ्या विमानतळांपैकी एक ठरेल.”
जमीन देणाऱ्या १७० शेतकऱ्यांपैकी एक असलेले मोदक शर्मा म्हणाले, “जेव्हा आमची जमीन अधिग्रहित करण्यात आली तेव्हा इतक्या मोठ्या आश्वासनांबाबत मला शंका होती. पण आज त्या जागेचे झालेले रूप पाहून मला खूप अभिमान वाटतो.”







