तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी हिंदू देवतांच्या अस्तित्वाची खिल्ली उडवल्यानंतर आता ते टीकेचे धनी बनले आहेत. रेवंत रेड्डी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर विरोधी पक्ष भाजप आणि बीआरएसने तात्काळ माफी मागण्याची मागणी केली आहे. एका कार्यक्रमात बोलताना रेड्डी यांनी हिंदू परंपरेतील देवांच्या संख्येवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि हनुमान हे अविवाहितांचे देव होते असेही म्हटले.
रेवंत रेड्डी म्हणाले की, “हिंदू किती देव मानतात? तीन कोटी आहेत का? इतके का अस्तित्वात आहेत? अविवाहितांसाठी एक देव आहे हनुमान. दोनदा लग्न करणाऱ्यांसाठी दुसरा देव आहे. आणि दारू पिणाऱ्यांसाठी आणखी एक देव आहे. कोंबडीच्या बळीसाठी एक आहे; डाळ आणि तांदळासाठी एक आहे. प्रत्येक गटाचा स्वतःचा देव आहे,” असे वक्तव्य रेड्डी यांनी केले. रेड्डी यांच्या या वक्तव्यावर लगेचच तीव्र प्रतिक्रिया उमटल्या, भाजप आणि बीआरएसने मुख्यमंत्र्यांवर हिंदू श्रद्धेचा अपमान केल्याचा आणि धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला.
भाजपा नेते चिक्कोटी प्रवीण म्हणाले की, रेड्डी यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील हिंदूंना “लाज” वाटली. “काँग्रेस आणि रेवंत रेड्डी यांना लाज वाटत नाही. सर्व सभांमध्ये ते म्हणतात की काँग्रेस मुस्लिमांमुळे आहे. मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी आणि त्यांचे विधान मागे घ्यावे,” असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांवर टीका करताना, बीआरएस नेते राकेश रेड्डी अनुगुला म्हणाले की, हिंदू देवतांची थट्टा करणे ही आजकाल प्रत्येकाची फॅशन बनली आहे. “रेवंत रेड्डी हे कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावतात असे बोलणे दुर्दैवी आहे. ते ज्यांच्यासाठी काम करतात त्यांना प्रभावित करण्यासाठी ते असे बोलत आहेत का? त्यांनी ताबडतोब हिंदू समुदायाची माफी मागावी,” बीआरएस नेत्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा..
काशी तमिळ संगमम ४.० : तमिळनाडूहून वाराणसीला पोहोचणे सुलभ
‘धर्मांतरणानंतर अनुसूचित जातीचा लाभ मिळतोच कसा?’
एअर इंडियाच्या एअरबसचे महिनाभर सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय उड्डाण
पाकिस्तानने श्रीलंकेला पाठवली मुदत संपलेली पाकिटे
हिंदू देवतांबद्दलच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची रेड्डी यांची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी, भाजपवर हल्लाबोल करताना रेड्डी म्हणाले होते की, “देवाच्या फोटोसह काहीतरी मागणारे भिकारी होते, हिंदू नाहीत.” देव मंदिरात असावा आणि भक्ती हृदयात असावी. असे लोकच खरे हिंदू आहेत. भाजप नेते रस्त्यांवर देवाचा फोटो लावतात आणि मते मागतात, असे वक्तव्य रेड्डी यांनी गेल्या वर्षी आरमूरमध्ये केले होते.







