संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सातत्याने झालेला गोंधळ आणि कामकाजात आलेल्या व्यत्ययाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, संसद चालवण्याची जबाबदारी कोणत्याही एका पक्षाची नसून सरकार आणि विरोधक या दोघांची समान आहे. पण सरकार किंवा विरोधकांपैकी एखादा एक पक्ष सभागृहाचे कामकाज रोखण्यावर ठाम राहिला, तर सध्या पाहायला मिळत आहे तशीच परिस्थिती संसदेत निर्माण होते.
हरिवंश यांनी असा प्रश्नही उपस्थित केला की, राजकीय पक्ष सातत्याने संविधानाची चर्चा करतात आणि संविधानाच्या प्रती हातात घेऊन फिरतात; मात्र त्यांच्या प्रत्यक्ष वर्तनातून संविधानावरील श्रद्धा किती दिसून येते? हरिवंश यांनी सध्याच्या आंतरराष्ट्रीय राजकीय आणि सुरक्षा परिस्थितीचा उल्लेख करत अशा काळात संसदेचे कामकाज योग्य पद्धतीने चालणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, आपण आपल्या मागील पिढीला विचारले पाहिजे की, २०१४ नंतर आपण ‘विकसित भारताचे’ स्वप्न का पाहिले? ७०-८०च्या दशकात चीन आपल्यापेक्षा अनेक बाबतीत मागे होता मात्र त्याने नंतर जे परिवर्तन घडवले त्यानंतर चीन आज अव्वलस्थानी पोहोचला. आजच्या पिढीने त्या नेतृत्वाला सवाल केले पाहिजेत, की, २०१४नंतरच आपल्या विकसित भारताचे स्वप्न का पाहावे लागले?
हे ही वाचा:
उदय सामंतांच्या दौऱ्याआधी चाकण एमआयडीसीत रातोरात खड्डे बुजवले
बोरिवलीत प्रयोगशाळेत केली जात होती गांजाची लागवड
आपण भ्रष्टाचार केला नाही म्हणत तृणमूल नेत्याची आत्महत्या
संकटकाळात सत्ताधारी- विरोधक एकत्र यावे
हरिवंश यांनी सांगितले की, जग सध्या गंभीर ऊर्जा संकटातून जात आहे. असे असतानाही आपल्या देशात परिस्थिती तितकी गंभीर नाही. याचे कारण म्हणजे आपण स्वतःला मजबूत केले आहे. अशा संकटाच्या परिस्थितीत देशातील जनतेने एकत्र येऊन देश पुढे नेला पाहिजे. संसदेत गोंधळ घालून लोकशाहीच्या मंदिराचे कामकाज ठप्प करण्याऐवजी सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांनी एकत्रितपणे देशाच्या हिताचा विचार केला पाहिजे.
