आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वसर्मा यांनी ५ एप्रिल रोजी प्रचार सभेत काँग्रेस नेत्यांवर जोरदार वैयक्तिक टीका केली. त्यांनी विशेषतः राहुल गांधी आणि गौरव गोगोई यांना लक्ष्य केले. सरमा यांनी राहुल गांधी यांना “पप्पू” असे संबोधले आणि गौरव गोगोई यांना “छोटा पप्पू” असे म्हटले, ज्यामुळे आसाममधील निवडणुकांपूर्वी राजकीय वातावरण अधिक तापले आहे.
मुख्यमंत्र्यांनी विरोधकांकडून होत असलेल्या संभाव्य कायदेशीर कारवाईच्या दाव्यांनाही उत्तर दिले. राहुल गांधी म्हणाले होते की, काँग्रेसचे सरकार आल्यानंतर ते हिमंता बिस्वसर्मा यांना अटक करतील. त्यावर बिस्वसर्मा म्हणाले की, “जे लोक म्हणतात की ते हिमंता बिस्वा सरमा यांना अटक करतील, त्यांना सांगतो की, त्यासाठी इंदिरा गांधी, राजीव गांधी, आणि राहुल गांधी यांना पुन्हा जन्म घ्यावा लागेल. हे या जन्मात शक्य नाही,” असे ते म्हणाले.
सरमा यांनी पुढे असेही म्हटले की, त्यांच्या राजकीय विरोधकांना त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी “अनेक जन्म” घ्यावे लागतील.
हे ही वाचा:
टँक फुल, पण खिसा रिकामा! हाँगकाँगमध्ये पेट्रोल दरांचा स्फोट
भारताच्या पर्यटन नकाशावर महाराष्ट्र आघाडीवर
७ वर्षांनंतर भारताची इराणकडून पहिली तेल खरेदी
हिमंता हे सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री
त्याआधी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी भाजपवर टीका अधिक तीव्र करत असमचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वसर्मा यांच्यावर थेट हल्ला चढवला. त्यांनी सरमा यांना “भारतामधील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री” असे संबोधत, राज्याला मोठ्या उद्योगपतींसाठी “लँड एटीएम” बनवल्याचा आरोप केला.
कार्बी आंगलाँग हिल्स जिल्ह्यातील बोकाजन येथे काँग्रेस उमेदवार रतन एंग्टी यांच्या समर्थनार्थ आयोजित मोठ्या प्रचार सभेत बोलताना राहुल गांधी यांनी भाजपवर व्यापक भ्रष्टाचार आणि कॉर्पोरेट हितसंबंधांना प्राधान्य देण्याचा आरोप केला.
त्यांनी दावा केला की, हिमंता बिस्वसर्मा यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ७ हजार बिघा जमीन पतंजलीला आणि १८ हजार बिघा जमीन अदानी उद्योग समुहाला दिली आहे. हे निर्णय अभूतपूर्व असून भारतीय शेतकऱ्यांसाठी हानिकारक असल्याचे त्यांनी म्हटले.
“ही जमीन लोकांकडून हिसकावून घेतली गेली आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा आणि हिमंता बिस्वसर्मा यांनी आसाममध्ये ‘लँड एटीएम’ तयार केले आहे. ते लोकांकडून जमीन घेऊन मोठ्या उद्योगपतींना देतात,” असे राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी यांनी पुढे असेही सांगितले की, काँग्रेस सरकार सत्तेत आल्यास मुख्यमंत्री सरमा यांच्यावर कारवाई केली जाईल. “ते आता आत्मविश्वासात दिसत आहेत, पण एकदा कारवाई सुरू झाली की ते शांत होतील,” असा इशाराही त्यांनी दिला.







