भारतात १८३५ पासून ब्रिटिश राजकारणी थॉमस मॅकॉलेने निर्माण केलेल्या पाश्चात्त्य मनोवृत्तीचे साखळदंड तोडण्याची वेळ आली आहे. येत्या १० वर्षांत हे आव्हान आपल्याला पार पाडायचे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सांगितले. इंडियन एक्स्प्रेस वृत्तसमुहाचे संस्थापक रामनाथ गोएंका परिसंवादात पंतप्रधान बोलत होते.
भारतीय शिक्षणसंस्थेवर मॅकॉलेने कशापद्धतीने हल्ला केला आणि ती शिक्षणपद्धती मुळासकट उपटून टाकण्यात तो कसा यशस्वी ठरला याविषयी सांगितले आणि आता ही गुलामीची मानसिकता असलेली शिक्षणपद्धती आपण फेकून देणे आवश्यक आहे, यासाठी निश्चय करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, थॉमस मॅकॉलेने १८३५ मध्ये भारतीय ज्ञानप्रणाली उद्ध्वस्त करून, स्थानिक शिक्षणव्यवस्थेला नाकारून आणि पाश्चात्त्य शिक्षण लादून भारतीयांना गुलाम बनविण्याचा प्रयत्न केला होता. आता पुढील दहा वर्षांत, म्हणजे मॅकॉलेच्या मोहिमेला २०० वर्षे पूर्ण होण्यापूर्वी, भारताने त्या वारशाचा अंत करण्याची शपथ घ्यावी.
मॅकॉलेचा उद्देश मनाने इंग्रज’ तयार करणे
मोदी यांनी सांगितले की, मॅकॉलेचे ध्येय असे लोक घडवणे होते जे “दिसायला भारतीय पण मनाने ब्रिटिश” असतील.
यामुळे भारताने मोठी किंमत चुकवली, कारण परकीय गोष्टी श्रेष्ठ आहेत असा दृष्टिकोन भारतीय समाजात खोलवर रुजला.
ते पुढे म्हणाले, मॅकॉलेने भारताचा आत्मविश्वास खच्ची केला. कमतरतेची भावना निर्माण केली. एका झटक्यात हजारो वर्षांची भारतीय ज्ञानपरंपरा, विज्ञान, कला, संस्कृती आणि जीवनपद्धती बाजूला सारली. मोदी म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरही या मानसिकतेचा प्रभाव कायम राहिला. शिक्षणापासून अर्थव्यवस्थेपर्यंत, सामाजिक आकांक्षा परकीय नमुन्यांप्रमाणे बदलल्या. जेव्हा एखादे राष्ट्र स्वत:चा सन्मान करत नाही तेव्हा ते आपल्या स्वदेशी परिसंस्थेला स्वतःहून नाकारायला लागते,” असे ते म्हणाले.
हे ही वाचा:
दिल्ली ब्लास्ट प्रकरण: मुंबईत तीन संशयित ताब्यात
सेन्सेक्स २७७ अंकांनी घसरून बंद
एशेजमधील सर्वाधिक विकेट घेणारे टॉप ५ गोलंदाज
‘हसीना गुन्हेगार, मग मोहम्मद युनूस निरपराध कसे?’
मोदींनी अनेक देशांचा दाखला देत सांगितले की, जपान आणि दक्षिण कोरिया यांनी पाश्चात्त्य कल्पना स्वीकारल्या,
पण आपल्या भाषांचे आणि परंपरांचे मूळ धागे जपले. भारतात मात्र स्वातंत्र्यानंतर स्वतःच्या वारशापासून दूर जाण्याची प्रवृत्ती दिसली. ते म्हणाले, “वारशाचा अभिमान नसला, तर त्याचे जतन करण्याची प्रेरणा राहत नाही. आणि जतन नसेल तर वारशाकडे फक्त भग्न दगडमातीचे अवशेष म्हणून पाहिले जाते.
नवीन शिक्षण धोरण भारतीय भाषांना प्राधान्य देते, असे सांगत मोदी म्हणाले की, ते इंग्रजीचे विरोधक नाहीत, पण भारतीय भाषांचे समर्थक आहेत.
राजकीय घडामोडींकडे वळत त्यांनी एनडीएच्या अलीकडील बिहार विजयाचा उल्लेख केला. ते म्हणाले, राज्यांचे वर्तमान राजकारण त्यांच्या पक्षांचे भविष्य घडवते. लालू प्रसाद यादव यांच्याकडे १५ वर्षे सत्ता होती, पण त्यांनी विकासाऐवजी ‘जंगलराज’ आणले.
मोदींनी विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना सांगितले, “आम्ही सतत निवडणूक मोडमध्ये नसतो — सेवा करण्यासाठी २४ तास भावना मोड मध्ये राहावे लागते. त्यांनी सांगितले की काही पक्षांनी समाजन्यायाच्या नावाखाली फक्त स्वतःचा फायदा साधला. आज भारतातील ९४ कोटी लोक सामाजिक सुरक्षेच्या आवाक्यात आहेत; दशकापूर्वी हे प्रमाण २५ कोटी होते.
कॉंग्रेसवर ‘अर्बन नक्षलवाद’ वाढवण्याचा आरोप करताना मोदींनी म्हटले, नक्षलवादाचा प्रभाव झपाट्याने कमी होत आहे. पण कॉंग्रेसने नक्षलवाद शहरांपर्यंत नेला. “अर्बन नक्षलांनी” आता कॉंग्रेसला “मुस्लिम लीग-युक्त माओवादी कॉंग्रेस” बनवले.







