पुढील राष्ट्रीय जनगणना मोहिमेत जातनिहाय माहिती गोळा केली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी केली. कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेयर्सच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं.”कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेयर्सने आगामी जनगणना मोहिमेत जात नोंदणी समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे,” असे वैष्णव यांनी माध्यमांना सांगितले.
या मोठ्या घोषणेनंतर वैष्णव यांनी काँग्रेसवर निशाणा साधत सांगितले की, काँग्रेसने नेहमीच जात जनगणनेचा विरोध केला आहे. त्यांनी इंडी आघाडीतील इतर पक्षांवरही टीका केली आणि त्यांच्यावर राजकीय फायद्यासाठी जातनिहाय जनगणनेचा गैरवापर केल्याचा आरोप केला.
हे ही वाचा:
जगाला माहिती आहे पाकिस्तान काय आहे
पंतप्रधान मोदी रशिया दौऱ्यावर जाणार नाहीत!
“काश्मीर समस्येवर एकमेव मार्ग म्हणजे पीओके ताब्यात घेणे”
‘हाउसफुल ५’ च्या टीझरने वाढवला सस्पेन्स
वैष्णव म्हणाले, “२०१० मध्ये दिवंगत डॉ. मनमोहन सिंग यांनी कॅबिनेटमध्ये जात जनगणनेचा विषय मांडण्याचे सांगितले होते. या विषयावर एक मंत्रीगट स्थापन करण्यात आला. बहुतेक राजकीय पक्षांनी जात जनगणनेची शिफारस केली होती. तरीही काँग्रेस सरकारने फक्त एक सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला.”
ते पुढे म्हणाले, “काँग्रेस आणि तिच्या इंडी आघाडीतील भागीदारांनी जात जनगणना हा विषय फक्त राजकीय साधन म्हणून वापरला आहे. काही राज्यांनी हे सर्वेक्षण पारदर्शकतेने केले, तर काहींनी फक्त राजकीय हेतूने असे सर्वेक्षण केले आहे.”
काँग्रेस, इंडी आघाडी व काही प्रादेशिक पक्षांकडून केंद्र सरकारने जात जनगणना जाहीर करावी, अशी दीर्घकालीन मागणी होती. अलीकडेच काँग्रेसशासित कर्नाटकमध्ये स्वतंत्र जात सर्वेक्षण करण्यात आले आहे.