नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू आणि ज्येष्ठ राजकीय नेते चंद्रकुमार बोस यांनी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस (टीएमसी) पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षात प्रवेश केल्यानंतर अवघ्या चार महिन्यांत त्यांनी हा निर्णय घेतला असून, राजीनाम्यामागे “वैयक्तिक कारणे” असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
चंद्रकुमार बोस यांनी आपल्या राजीनामा पत्रात, “वैयक्तिक कारणांमुळे मी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तत्काळ प्रभावाने राजीनामा देत आहे,” असे नमूद केले आहे. त्यांच्या या निर्णयावर टीएमसीकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
चंद्रकुमार बोस यांनी यावर्षी एप्रिलमध्ये पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी टीएमसीमध्ये प्रवेश केला होता. त्याआधी त्यांनी भारतीय जनता पक्ष (भाजप) सोडत, भाजपमध्ये जाण्याचा निर्णय ही “ऐतिहासिक चूक” असल्याचे म्हटले होते. त्यांनी भाजपच्या राजकारणावर टीका करत अधिक सर्वसमावेशक आणि धर्मनिरपेक्ष विचारसरणीच्या राजकारणाची गरज असल्याचे सांगितले होते.
भाजपमध्ये जवळपास नऊ वर्षे कार्यरत राहिल्यानंतर चंद्रकुमार बोस यांनी सप्टेंबर २०२३ मध्ये पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी त्यांनी पक्षाच्या विचारसरणीशी मतभेद असल्याचे कारण दिले होते. त्यानंतर काही काळ कोणत्याही पक्षापासून दूर राहिल्यानंतर त्यांनी टीएमसीमध्ये प्रवेश केला होता.
हे ही वाचा:
पासपोर्ट कालबाह्य, व्हिसाही संपला; स्पा सेंटरमधून थायलंडची महिला ताब्यात
डॉलरची घसरण अन् मौल्यवान धातूंना बूस्ट
चिन्मय कृष्ण दास यांना दोन प्रकरणांत जामीन; तुरुंगातून सुटकेची शक्यता नाही
पाकव्याप्त काश्मीरमधील वार्तांकनानंतर ‘अल जझीरा’ची अडवणूक
टीएमसीमध्ये प्रवेश करताना चंद्रकुमार बोस यांनी राज्यात सर्वसमावेशक राजकारणाची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले होते. तसेच समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणाऱ्या राजकीय विचारांना पाठिंबा देण्याची भूमिका त्यांनी मांडली होती. मात्र, पक्षात दाखल झाल्यानंतर अवघ्या चार महिन्यांतच त्यांनी राजीनामा दिल्याने पश्चिम बंगालच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत अद्याप कोणतीही भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही.







