जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी तुलबुल नेव्हिगेशन प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्याचे आवाहन केले होते. यानंतर मेहबूबा मुफ्ती यांनी त्यांच्यावर टीका करत ही योग्य वेळ नसल्याचे म्हटले होते. यावर आता ओमर अब्दुल्ला यांनी पलटवार करत मुफ्ती यांना खडेबोल सुनावले आहेत.
ओमर अब्दुल्ला यांनी मुफ्ती यांना उद्देशून म्हटले आहे की, “दुर्दैवाची गोष्ट म्हणजे स्वस्त प्रसिद्धी मिळविण्यासाठी आणि सीमेपलीकडे बसलेल्या काही लोकांना खूश करण्याच्या तुमच्या आंधळ्या लालसेने, तुम्ही हे मान्य करण्यास नकार देता की सिंधू पाणी वाटप करार हा जम्मू- काश्मीरच्या लोकांच्या हिताचा सर्वात मोठा ऐतिहासिक विश्वासघात आहे. मी नेहमीच या कराराला विरोध केला आहे आणि करत राहीन. एका अन्याय कराराला विरोध करणे हे कोणत्याही प्रकारे, स्वरूपाने युद्धखोरी नाही, तर ते जम्मू-काश्मीरच्या लोकांना पाणी स्वतःसाठी वापरण्याचा अधिकार नाकारणाऱ्या ऐतिहासिक अन्यायाची दुरुस्ती करण्याबद्दल आहे.”
Actually what is unfortunate is that with your blind lust to try to score cheap publicity points & please some people sitting across the border, you refuse to acknowledge that the IWT has been one of the biggest historic betrayals of the interests of the people of J&K. I have… https://t.co/j55YwE2r39
— Omar Abdullah (@OmarAbdullah) May 16, 2025
प्रकरण काय?
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्वीट करत तुलबुल नेव्हिगेशन प्रकल्प पुन्हा सुरू करण्याची भूमिका मांडली होती. यावर मेहबूबा मुफ्ती यांनी पोस्ट करून तणावाच्या काळात अशी मागणी केल्याबद्दल ओमर यांच्यावर टीका केली. त्यांनी लिहिले की, “भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी तुलबुल नेव्हिगेशन प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचे आवाहन करणे अत्यंत दुर्दैवी आहे. ज्या वेळी दोन्ही देश पूर्ण युद्धाच्या उंबरठ्यावरून परतत आहेत, जम्मू आणि काश्मीरमधील लोकांना मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान सहन करावे लागले आहे, अशा वेळी असे विधान करणे केवळ बेजबाबदारच नाही तर धोकादायकपणे चिथावणी देणारे आहे. आपल्या लोकांना देशातील इतर कोणत्याही नागरिकाइतकेच शांततेचा अधिकार आहे. पाण्यासारख्या जीवनावश्यक वस्तूला शस्त्र बनवणे हे केवळ अमानवीयच नाही तर द्विपक्षीय समस्येचे आंतरराष्ट्रीयीकरण होण्याचा धोका देखील निर्माण करते.”
हे ही वाचा :
‘भोंगा मुक्त महाराष्ट्र’ हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार!
“पाक सध्या प्रोबेशनवर; वर्तन सुधारल्यास ठीक अन्यथा कठोर शिक्षा देणार!”
“भविष्यात ‘ऑपरेशन सिंदूर’चा अभ्यास लष्करी रणनीतीकार, विद्यार्थी करतील”
भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर इस्रायल खुश, दहशतवादविरुद्धच्या लढाईत पाठींबा!
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले की, या व्हिडिओमध्ये तुम्ही जे पाहत आहात ते तुलबुल नेव्हिगेशन बॅरेज आहे. १९८० च्या दशकात ते सुरू झाले होते परंतु सिंधू पाणी कराराबाबत पाकिस्तानच्या दबावामुळे ते सोडून द्यावे लागले. आता सिंधू पाणी करार तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे, मला वाटते की कदाचित आपण हा प्रकल्प पुन्हा सुरू करू शकतो. जम्मू आणि काश्मीरला याचे अनेक फायदे मिळतील.







