केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी भूज एअरबेसवरून पाकिस्तानवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेले नाही याचा पुनरुच्चार केला. तसेच राजनाथ सिंह यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) कडून पाकिस्तानला देण्यात येणाऱ्या बेलआउट पॅकेजवरही प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, या संघटनेने पाकिस्तानला १ अब्ज रुपयांची मदत देणे हा चुकीचा निर्णय आहे. पाकिस्तानला मिळणाऱ्या बहुतेक मदतीचा वापर दहशतवादी कारवायांना चालना देण्यासाठी आणि त्यांच्या दहशतवादी पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी केला जातो.
भूज हवाई दल तळावर जवानांना संबोधित करताना राजनाथ सिंह म्हणाले की, “आम्ही पाकिस्तानला सध्या प्रोबेशनवर ठेवले आहे. जर त्याचे वर्तन सुधारले तर ठीक, अन्यथा कठोर शिक्षा दिली जाईल. ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही. जे काही झाले तो फक्त एक ट्रेलर होता आणि योग्य वेळ आल्यावर आम्ही जगाला संपूर्ण चित्रपट दाखवू,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. संरक्षणमंत्र्यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली आणि जखमींच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली.
ते पुढे म्हणाले की, “भुज १९६५ आणि १९७१ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या विजयाचे साक्षीदार होते. आज पुन्हा एकदा भूज पाकिस्तानविरुद्धच्या विजयाचे साक्षीदार झाले आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान जे काही जवानांनी केले त्याने सर्व भारतीयांना अभिमान वाटला आहे मग ते भारतात असोत किंवा परदेशात. पाकिस्तानमध्ये पोसल्या जाणाऱ्या दहशतवादाला चिरडून टाकण्यासाठी भारतीय हवाई दलाला फक्त २३ मिनिटे पुरेशी होती,” असे राजनाथ सिंह म्हणाले. लोकांना नाश्ता करायला लागणाऱ्या वेळेत शत्रूंना संपवले असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. शत्रूच्या भूमीवर जाऊन क्षेपणास्त्रे टाकली. त्याचा आवाज फक्त भारताच्या सीमेपुरता मर्यादित नव्हता तर संपूर्ण जगाने तो ऐकला. हा आवाज फक्त क्षेपणास्त्रांचा नव्हता तर शौर्याचाही होता, असे राजनाथ सिंह म्हणाले. मंत्री सिंह पुढे म्हणाले की, पाकिस्ताननेही ब्रह्मोस क्षेपणास्त्राची ताकद मान्य केली आहे. आपल्याकडे जुनी म्हण आहे, “दिन में तारे देखना” पण भारतात निर्मित ब्रह्मोस क्षेपणास्त्राने पाकिस्तानला “रात के अंधेरे में दिन का उजाला” दाखवले.
हे ही वाचा :
पाकला भरणार धडकी; लष्करी ताकदीच्या बळकटीकरणासाठी ५० हजार कोटी
इराकी जहाजाच्या क्रूमधील पाकिस्तानी नागरिकाला कारवार बंदरात प्रवेश नाकारला
पाकिस्तानच्या खोट्या बातमीचे ‘विमान’ कोसळले
ट्रम्प यांचा ‘तो’ दावा एस जयशंकर यांनी फेटाळला
संरक्षण मंत्र्यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने उध्वस्त केलेले दहशतवादी नेटवर्क पुन्हा उभारण्याचा पाकिस्तान प्रयत्न आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला देशाला दिलेल्या नवीन मदत पॅकेजचा पुनर्विचार करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. “पाकिस्तान सरकारने मुरीदके आणि बहावलपूर येथे असलेल्या लष्कर-ए-तैयबा (एलईटी) आणि जैश-ए-मोहम्मद (जेईएम) च्या दहशतवादी पायाभूत सुविधांच्या पुनर्बांधणीसाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. आयएमएफकडून येणाऱ्या एक अब्ज डॉलर्सचा एक महत्त्वाचा भाग निश्चितच या दहशतवादी पायाभूत सुविधांसाठी वापरला जाईल. हे आयएमएफकडून अप्रत्यक्ष निधी मानले जाणार नाही का?” असा सवाल राजनाथ सिंह यांनी केला. मसूद अझहर संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेला दहशतवादी असला तरी, तेथील सरकार सामान्य पाकिस्तानी करदात्यांकडून गोळा केलेले पैसे त्याच्यावर खर्च करण्याची योजना आखत आहे, असेही सिंह म्हणाले.
