केरळ विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच भारतीय जनता पार्टी (भाजपा) तिरुवनंतपुरम महानगरपालिकेवरील ऐतिहासिक विजयाचा जल्लोष साजरा करणार आहे. तिरुवनंतपुरममध्ये भाजपला पहिल्यांदाच सत्ता मिळाली असून, गेली चार दशके अखंडपणे सत्तेत असलेल्या लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट (एलडीएफ)च्या राजवटीला यामुळे पूर्णविराम मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या नगरसेवकांसाठी खास कार्यक्रम आयोजित केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महापौर व्ही. व्ही. राजेश यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या एका शिष्टमंडळाला १३ फेब्रुवारी रोजी त्यांच्या अधिकृत निवासस्थानी डिनरसाठी वैयक्तिकरित्या आमंत्रित केले आहे. या कार्यक्रमाअंतर्गत भाजपने १०१ सदस्यांच्या तिरुवनंतपुरम महानगरपालिका परिषदेतील आपल्या सर्व ५० नगरसेवकांना नवी दिल्लीला बोलावले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे नगरसेवक ९ फेब्रुवारी रोजी केरळ एक्सप्रेस ट्रेनने दिल्लीकडे रवाना होतील. ज्या-ज्या स्थानकांवर ही ट्रेन जास्त वेळ थांबते, त्या-त्या ठिकाणी विविध राज्यांतील भाजप युनिट्सकडून स्वागत समारंभांचे आयोजन केले जाणार आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या डिनर कार्यक्रमाव्यतिरिक्त, हे शिष्टमंडळ दिल्लीतील राष्ट्रीय महत्त्वाच्या स्मारकांनाही भेट देणार आहे. तिरुवनंतपुरम महानगरपालिकेच्या निकालांना (जे भाजपने केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील ‘सुवर्ण विजय’ असे संबोधले आहे) राष्ट्रीय पातळीवरील मैलाचा दगड बनवण्याचा निर्णय केंद्रीय नेतृत्वाने घेतला आहे.
हे ही वाचा:
श्री देव रवळनाथ पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा होणार
गोवा विशेष : आता काही महिने नाही, वर्षभर पर्यटन!
कार्ल्सबर्ग इंडियाचा आयपीओ लवकरच मार्केटमध्ये
पंतप्रधानांच्या भाषणापूर्वी विरोधी खासदारांनी घातला प्रचंड गोंधळ, सभागृह तहकूब
या दौऱ्यादरम्यान दिल्लीमध्ये तिरुवनंतपुरम विकास दस्तऐवजाचे अनावरण होण्याचीही शक्यता आहे. याआधी पंतप्रधान मोदी यांनी या कॉर्पोरेशन निवडणुकीच्या निकालांना ‘नव्या युगाची सुरुवात’ आणि ‘सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा ऐतिहासिक टप्पा’ असे संबोधले होते. निवडणूक निकालानंतर त्यांनी महापौर राजेश आणि उपमहापौर आशा नाथ यांचे अभिनंदन करत वैयक्तिक पत्रेही पाठवली होती.
एका अपक्ष नगरसेवकाच्या पाठिंब्याने भाजपने महानगरपालिकेत सत्ता स्थापन केली, जे प्रथमच घडले आहे. नगरसेवकांना अशा प्रकारचे निमंत्रण मिळणे अपवादात्मक मानले जाते आणि त्यामुळे या विजयाला केंद्रीय नेतृत्व किती मोठे राजकीय महत्त्व देत आहे, हे स्पष्ट होते. उल्लेखनीय बाब म्हणजे १४० सदस्यांच्या केरळ विधानसभा मध्ये भाजपचा सध्या एकही आमदार नाही.







