राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेला प्रचार मंगळवारी सायंकाळी अधिकृतपणे थांबला. आज, १५ जानेवारी रोजी मतदान होत असून उद्या, शुक्रवार १६ जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. उद्या दुपारपर्यंत या निवडणुकांचे एकूण चित्र स्पष्ट होणार असून, राज्यातील मतदारांनी नेमका कोणत्या पक्षावर विश्वास टाकला आहे, हे समोर येणार आहे.
राज्यातील २९ महानगरपालिकांमधील एकूण २,८६९ जागांसाठी सुमारे १६ हजारांहून अधिक उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. जवळपास नऊ वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुका सर्वच प्रमुख राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेच्या मानल्या जात असून, सत्तेचा कौल देणाऱ्या या निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
या निवडणुकांमध्ये सर्वाधिक लक्ष मुंबई महानगरपालिकेच्या निकालाकडे लागले आहे. मुंबईत एकूण २२७ वॉर्ड असून, त्यासाठी १,७०० हून अधिक उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यंदा उमेदवारांची संख्या मागील निवडणुकीच्या तुलनेत घटलेली दिसून येते. २०१७ साली मुंबईत २,२७५ उमेदवार रिंगणात होते. यंदा त्यामध्ये सुमारे २५.२७ टक्क्यांची घट झाली आहे. २०१७ मध्ये १,१९० पुरुष, १,०८४ महिला आणि एक तृतीयपंथी उमेदवार निवडणूक लढवत होते.
हे ही वाचा :
एक कोटीत ‘पसीना वाले हनुमान’ मंदिराचा कायाकल्प
संपूर्ण पीएफ रक्कम कधी काढता येते?
बिनविरोध प्रकरणी न्यायालयाने सरोदेंना खडसावले, ठोठावला दंड
चार वर्षांनंतर आयसीसी वनडे रँकिंगमध्ये विराट कोहली पुन्हा अव्वल
प्रत्येक वॉर्डात चुरशीची लढत पाहायला मिळत असून, अपक्ष उमेदवारांची संख्याही लक्षणीय आहे. राज्यभरातील विविध महानगरपालिकांमध्ये सुमारे ६६ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची माहिती समोर आली आहे. या बिनविरोध निवडींमुळे काही ठिकाणी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईसह प्रमुख शहरांमध्ये सभा घेत विकासाचा अजेंडा पुढे ठेवला. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, सार्वजनिक वाहतूक आणि कचरा व्यवस्थापन सुधारण्याची आश्वासने त्यांनी दिली. महानगरपालिका आणि राज्य सरकार यांच्यातील समन्वय वाढवून रखडलेले प्रकल्प वेगाने पूर्ण केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. स्मार्ट सिटी उपक्रम, डिजिटल सेवा, ई-गव्हर्नन्सचा विस्तार आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन हे मुद्दे त्यांच्या भाषणात ठळकपणे मांडण्यात आले. मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मेट्रो, कोस्टल रोड आणि अंतर्गत रस्त्यांच्या कामांना प्राधान्य दिले जाईल, असा दावाही त्यांनी केला.
दुसरीकडे, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापालिकांची स्वायत्तता कमी केली जात असल्याचा आरोप केला. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्थानिक प्रश्न, अनधिकृत बांधकामे आणि वाहतूक कोंडीवरून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली. दोन्ही ठाकरे बंधूंचा प्रचार मराठी अस्मितेवर केंद्रित होता. मुंबई आणि ठाण्यात प्रत्येकी एक सभा घेत त्यांनी मराठी मतदारांना भावनिक आवाहन केले.
प्रचाराचा गदारोळ थांबला असला तरी आरोप–प्रत्यारोपांची धग मतदारांच्या मनात कायम आहे. आजच्या मतदानातून मतदार नेमके कोणाच्या आश्वासनांवर विश्वास ठेवतात आणि कोणाला कौल देतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.







