ठाकरे सरकारने गुरुवारी अचानक एमपीएससी परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला. पण या निर्णयाविरोधात राज्यभर रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांसमोर ठाकरे सरकारला झुकावे लागले आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून या संबंधीची घोषणा केली.
रविवारी १४ मार्च रोजी राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा होणार होती. पण परीक्षेच्या तीन दिवस आधी एक प्रसिद्धीपत्रक काढत ही परीक्षा पुढे ढकलण्याचे सांगण्यात आले. यावेळी परीक्षेची पुढची तारीख जाहीर करण्यात आली नाही. या विरोधात राज्यभरातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले. भर उन्हात हे विद्यार्थी सरकारच्या अनागोंदी कारभाराविरोधात आक्रोश करत होते. या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला, काही विद्यार्थ्यांना चक्कर येऊन ते कोसळले तरीही बाकीचे विद्यार्थी मागे हटले नाहीत. समाजाच्या प्रत्येक स्तरातून या विद्यार्थ्यांना प्रतिसाद मिळत होता आणि तो वाढत होता. विरोधी पक्षातील नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलाच पण या आंदोलनावरून ठाकरे सरकारला काँग्रेस, राष्ट्रवादीकडून घरचा आहेर मिळू लागला. माध्यमांनीही हा विषय चांगलाच लावून धरला.
अखेर मुख्यमंत्री ठाकरे यांना स्वतः फेसबुक लाईव्ह करत चौदा मार्चला होणारी परीक्षा त्या पुढील आठवड्याभरात घेण्यात येईल आणि ती तारीख शुक्रवारीच जाहीर करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. परीक्षा पुढे ढकलण्यामागे कोविडचे कारण असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. परीक्षा घेण्यासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ सध्या कोविडच्या कामात असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राज्यभर विद्यार्थ्यांनी केलेल्या आक्रोशानंतर सरकारला नमते घ्यावे लागले.
हे ही वाचा:
गडबडणारे सरकार आणि बडबडणारे राऊत
आमदार गोपीचंद पडळकर सरकारवर बरसले
आफ्रिकेतून परत पाठवलेली लस?- अतुल भातखळकर
आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या घोषणे नंतरही पुण्यात आंदोलन करणारे विद्यार्थी हे परीक्षा चौदा तारखेलाच घेण्यात यावी याबाबत ठाम होते. अखेर पुण्यात सुरु असलेले विद्यार्थ्यांचे हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करत सरकारने दडपशाही करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलनात सहभागी झालेले भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मुख्यमंत्र्यानी कोविडचे कारण देत परीक्षा पुढे ढकलल्याचे सांगितले पण पुढच्या आठ दिवसात कोविडचे आकडे वाढले तर सरकार काय करणार? असा सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.