दिल्लीतल्या जंतरमंतर येथे सुरू असलेल्या नीट परिक्षा पेपरफुटीविरोधातील आंदोलनाच्या निमित्ताने मुंबईत शिवाजी पार्क, दादर येथे उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा देणारे आंदोलन घेतले. पण या आंदोलनात नीट परीक्षा पेपरफुटी या विषयापेक्षा सरकार कसे पाडले पाहिजे, ते कसे बदलले पाहिजे, यावर उद्धव ठाकरेंनी भर देत भाषण केले. त्यात त्यांनी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही क्षुल्लक गोष्ट असून आता सरकारच बदलले पाहिजे असे वक्तव्य केले. सरकार बदलण्याचा लढा सुरू झाला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
आदित्य ठाकरे, संजय राऊत, आमदार महेश सावंत या सगळ्यांनी काळ्या कपड्यांमध्ये या आंदोलनात सहभाग घेतला. त्यावेळी सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या.
उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले की, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या असं लिहिलेले पोस्टर पाहिले. ती आता अगदी क्षुल्लक गोष्ट आहे. जे सरकार आपल्याला रोजीरोटी देऊ शकत नाही, शिक्षण देत नाही असे सरकार बदलण्याचा लढा सुरू झाला पाहिजे. धर्मेंद्र प्रधानच काय, सरकारच नको. सगळ्यांनी आता नेते व्हा. सरकार टिकणार की नाही, माहीत नाही पण ही आग टिकली पाहिजे. या आगीत सरकार भस्म झालं पाहिजे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, मंदिर लुटीविरोधात मी नागपूरला गेलो. तिथे कुणाचं केंद्र रा. स्व. संघ. याच संघाने मे महिन्यात होसबळे म्हणाले की, पाकिस्तानशी चर्चा केली पाहिजे. जो आतंकवादी घुसवतोय, अतिरेकी हल्ले करतोय त्यांच्याशी चर्चेचे दरवाजे खुले ठेवले पाहिजे. भागवतही तेच म्हणत आहेत. मग वांगचुक यांना भेटायला का गेला नाहीत?
हे ही वाचा:
अभिषेक बॅनर्जी यांच्या कार्यालयावरील पाडकामाला स्थगिती
फेसबुकवर ‘रशियन’ तरुणीची मैत्री पडली महागात
एसआयआरमध्ये उघड झाले मालेगावचे धक्कादायक वास्तव
२० जुलैला उपोषण थांबणार! सुरू होणार संसदेतला गोंधळ
आम्ही हिंदुत्ववादी आहोतच, आम्ही देशभक्त हिंदू आहोत. म्हणून मी भागवतांना विचारलं आज देशात चालू आहे हे कल्पनेच्या हिंदुराष्ट्रात बसतंय काय? हे हिंदूराष्ट्र आम्हाला अपेक्षित नाही. जो देशावर प्रेम करतो तो आमचा आहे.
उद्धव ठाकरेंनी सांगितले की, वेळ येईल तेव्हा मी दिल्लीला जाईन. हे आंदोलन आता फक्त जंतरमंतरपुरतं नाही देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलं पाहिजे. मोदी सरकारला आव्हान आहे. तुम्ही वन नेशन वन इलेक्शन हवंय ना जाहीर करा निवडणूक आम्ही तयार आहोत. तुम्ही तरुणांना कॉकरोच म्हणता. कुटुंबाची पर्वा न करता स्वातंत्र्याआधी तरुणांनी बलिदान केलं नसतं तर स्वातंत्र्य मिळालं नसतं. होय मी सुद्धा झुरळ आहे. तरुण झुरळ असतील. तर त्यांचे आईवडीलही झुरळ आहेत. देश काय झुरळांचा आहे?. या सत्तेला चिकटलेल्या गोचिडी आहे. लोकशाहीचं रक्त पिताहेत. त्यांना खेचून बाहेर काढावेच लागेल. आजपासून हा एल्गार सुरू होत आहे. इंग्रजांनीही असंच राज्य केलं होतं पण इंग्रजांना पाय लावून पळावं लागलं तसंच आपल्याला करावं लागेल. तुम्ही जिथे असाल देशाला विनंती करतो तुम्हाला जसं जमेल, झेपेल स्वातंत्र्य मिळविण्याचं युद्ध सुरू करा. मेणबत्ती, मशाल मोर्चे काढा, मानवी साखळी करा. आता देश यांचं ऐकणार नाही.
