भारताने पाकिस्तानवर केलेल्या प्रत्युत्तर कारवाईमुळे देशभरात देशभक्तीची लाट उसळली असून, सर्वसामान्यांपासून बॉलिवूडच्या कलाकारांपर्यंत सर्वजण भारतीय सेनेच्या शौर्याला सलाम करत आहेत. अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने आपल्या पोस्टद्वारे वीर जवानांचं कौतुक केलं, तर तिचे पती आणि भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली यांनीही ‘जय हिंद’ म्हणत भारतीय सेनेला मानवंदना दिली.
भारत-पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अनुष्काने इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली. “आम्ही भारतीय सशस्त्र दलांचे ऋणी आहोत. हे आमचे खरे हिरो आहेत, जे कठीण प्रसंगातही आमचं रक्षण करत आले आहेत. त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबांचं बलिदान अविस्मरणीय आहे. जय हिंद!”
या पोस्टवर विराट कोहलीने कमेंट करत लिहिलं, “जय हिंद।”
यानंतर विराटने स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्वतंत्र पोस्ट करत लिहिलं, “या कठीण काळात देशाचं रक्षण करणाऱ्या भारतीय सेनेसोबत आम्ही एकजुटीने उभे आहोत. त्यांच्या अटूट शौर्याला आणि त्यांच्या कुटुंबाच्या बलिदानाला आम्ही सलाम करतो.”
कॉमेडियन मुनव्वर फारुकी याने देखील देशवासीयांना एकत्र राहण्याचं आणि आपापसात न भांडण्याचं आवाहन केलं. त्याने लिहिलं, “आपण सुरक्षित आहोत कारण कोणी तरी सरहद्दीवर उभा आहे. यावेळी एकत्र राहणं, एकमेकांना साथ देणं अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक त्या सैनिकासाठी आणि त्याच्या आईसाठी प्रार्थना करा, जिने एवढ्या मोठ्या मनाने आपल्या लेकराला देशासाठी पाठवलं. भारतीय सेना जिंदाबाद! हिंदुस्थान आबाद राहो!”
दरम्यान, अभिनेत्री मौनी रॉय, रकुल प्रीत सिंग, सेलिना जेटली, अशोक पंडित आणि आर. माधवन यांनी देखील सोशल मीडियावर भारतीय सेनेच्या शौर्याला सलाम करत “देश वा मातृभूमीपेक्षा मोठं काहीच नाही!” असं म्हणत अभिमान व्यक्त केला आहे.