बीसीसीआयने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२५ हंगाम तात्काळ प्रभावाने अनिश्चित काळासाठी स्थगित केल्यानंतर, सर्व दहा फ्रँचायझी आता परराष्ट्र मंत्रालयाच्या पुढील सूचनेची प्रतीक्षा करत आहेत. या सूचनेनंतरच भारतीय व परदेशी खेळाडूंना, सहायक स्टाफ आणि अन्य क्रू सदस्यांना त्यांच्या घरी कसे सुरक्षितरित्या पाठवायचं, याचा निर्णय घेतला जाईल.
बीसीसीआयकडून अधिकृतपणे माहिती देण्यात आली आहे की, “आयपीएल २०२५ तातडीने स्थगित करण्यात आले आहे. सर्व फ्रँचायझी त्यांच्या ठिकाणी ३–४ तास थांबून पुढील सूचना मिळेपर्यंत वाट पाहत आहेत.”
सूत्रांच्या माहितीनुसार, “शुक्रवार संध्याकाळी परराष्ट्र मंत्रालयाकडून होणाऱ्या ब्रीफिंगनंतर पुढील दिशा ठरवली जाईल. त्यानंतरच खेळाडू, स्टाफ आणि इतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरी पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल.”
भारत-पाकिस्तान दरम्यान वाढलेल्या सीमावर्ती तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. पाकिस्तानकडून ड्रोन्स आणि हवाई हल्ल्यांनंतर जम्मू, पठाणकोट आणि उधमपूर येथे गुरुवारी संध्याकाळी ब्लॅकआउट जाहीर करण्यात आला, जे धर्मशालेजवळ आहेत.
या घटनेमुळे, पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात HPCA स्टेडियमवर सुरू असलेला सामना पहिल्या डावाच्या मध्यातच रद्द करण्यात आला.
धर्मशाला आणि उत्तर भारतातील इतर शहरांतील विमानतळ बंद झाल्यामुळे, सर्व खेळाडू, स्टाफ, सामनाधिकारी, कमेंटेटर, आणि ब्रॉडकास्ट टीमला शुक्रवारी सकाळी विशेष रेल्वेमार्गे धर्मशालामधून दिल्लीकडे हलवण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
याशिवाय, ऑस्ट्रेलियाच्या संघातील खेळाडू आणि स्टाफ सदस्य शनिवारी भारतातून परत जाण्याची शक्यता आहे, कारण क्रिकेट ऑस्ट्रेलिया (CA) आणि क्रिकेट वेस्ट इंडीज (CWI) यांनी त्यांच्या खेळाडूंच्या सुरक्षेबाबत अधिकृत निवेदन जारी केलं आहे.