भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने वनडे क्रिकेटमध्ये आणखी एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. इंग्लंडविरुद्ध एजबेस्टन येथे खेळल्या जात असलेल्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात बुमराहने आपल्या वनडे कारकिर्दीतील १५० बळींचा टप्पा पूर्ण केला.
दीर्घ कालावधीनंतर वनडे क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या बुमराहने इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकला बाद करत ही ऐतिहासिक कामगिरी केली. ब्रूकची विकेट घेताच बुमराहच्या वनडे कारकिर्दीतील १५० बळी पूर्ण झाले.
वनडे क्रिकेटमध्ये १५० बळी घेणारा बुमराह भारताचा दहावा वेगवान गोलंदाज, तर एकूण १६ वा भारतीय गोलंदाज ठरला आहे. उजव्या हाताच्या या वेगवान गोलंदाजाने आपल्या ९० व्या वनडे सामन्यात हा महत्त्वाचा टप्पा गाठला.
बुमराहने हॅरी ब्रूकला बाद करत आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. तो इंग्लंडमध्ये सर्वाधिक वनडे बळी घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. इंग्लंडच्या भूमीवर बुमराहच्या नावावर आता ३१ बळी जमा झाले आहेत. रवींद्र जडेजा ३० बळींसह दुसऱ्या स्थानावर आहे.
बुमराहने वनडे क्रिकेटमधील आपल्या ४ हजार ६०५ व्या चेंडूवर १५० वा बळी घेतला. चेंडूंच्या बाबतीत सर्वात जलद १५० वनडे बळी घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत बुमराह तिसऱ्या स्थानावर आहे. मोहम्मद शमीने ४ हजार ७० चेंडूंत, तर कुलदीप यादवने ४ हजार ५१३ चेंडूंत हा टप्पा पूर्ण केला होता.
भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे. कुंबळेने १९९० ते २००७ या कालावधीत २६९ सामन्यांत ३३४ बळी घेतले. भारतीय वेगवान गोलंदाजांमध्ये जवागल श्रीनाथ अव्वल स्थानावर असून, त्यांनी १९९१ ते २००३ या कालावधीत २२९ सामन्यांत ३१५ बळी घेतले आहेत.
भारताकडून वनडेत १५० किंवा त्याहून अधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अनिल कुंबळे (३३४), जवागल श्रीनाथ (३१५), अजित आगरकर (२८८), झहीर खान (२६९), हरभजन सिंग (२६५), कपिल देव (२५३), रवींद्र जडेजा (२३२), मोहम्मद शमी (२०६), व्यंकटेश प्रसाद (१९६), कुलदीप यादव (१९४), इरफान पठाण (१७३), मनोज प्रभाकर (१५७), आर. अश्विन (१५६), आशिष नेहरा (१५५) आणि सचिन तेंडुलकर (१५४) यांचा समावेश आहे.







