दिल्ली कॅपिटल्ससाठी आयपीएल २०२५ मध्ये पदार्पण करणारा युवा खेळाडू विप्रज निगम सध्या आपल्या अष्टपैलू कामगिरीमुळे चर्चेत आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात तो संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
‘जिओस्टार प्रेस रूम’मध्ये बोलताना विप्रजने आपल्या खेळातील बदल, संघातील अनुभव आणि विराट कोहलीविरुद्धची रणनीती याबद्दल सविस्तर माहिती दिली.
विप्रज म्हणाला की, “मी उत्तर प्रदेशसाठी संपूर्ण घरेलू हंगाम खेळलो आणि इंडिया ए सामन्यांमध्येही सहभाग घेतला. तिथून मला खूप शिकायला मिळालं. मोठ्या खेळाडूं सोबत ड्रेसिंग रूम शेअर करताना नवीन कौशल्यं आत्मसात करता आली. त्या अनुभवाचा उपयोग मी आयपीएलमध्ये करण्याचा प्रयत्न केला.”
संघाचा कर्णधार अक्षर पटेल, केएल राहुल आणि कोचिंग स्टाफ यांच्याकडून मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल तो म्हणाला, “मला कधीही अनुभव नसल्यासारखं वागवलं नाही. सर्वांनी मला सतत साथ दिली. दबावाच्या परिस्थितीत कसं खेळायचं, हे त्यांनी शिकवलं.”
विराट कोहलीविरुद्धची रणनीती सांगताना विप्रज म्हणाला,
“विराटसारख्या जागतिक दर्जाच्या फलंदाजाविरुद्ध चूक करण्याची अजिबात जागा नसते. थोडीशी चूक झाली तरी तो धावा काढतो. त्यामुळे योजना साधी असते, पण ती अंमलात आणणं महत्त्वाचं असतं. सामन्यादरम्यान परिस्थितीनुसार रणनीती बदलावी लागते.”
विराट कोहलीचा विकेट घेतल्याचा अनुभव शेअर करताना तो म्हणाला,
“विराट कोहलीचा विकेट घेणं म्हणजे स्वप्न पूर्ण झाल्यासारखं होतं. सामन्यानंतर मी त्यांच्याशी बोललो आणि माझ्या खेळात काय सुधारणा करावी याबद्दल विचारलं. त्यांनी सांगितलं की, कौशल्यात फारसा बदल करण्याची गरज नाही, पण नवीन गोष्टी शिकत राहा आणि स्वतःला सतत सुधारत राहा.”
दरम्यान, आयपीएल २०२६ मध्ये सलग दोन पराभवानंतरही संघाचा आत्मविश्वास कायम असल्याचं विप्रजने स्पष्ट केलं.
“आम्ही आमच्या चुका ओळखल्या आहेत आणि त्यावर काम करत आहोत. पुढील सामन्यात अधिक मजबूत पुनरागमन करू,” असा विश्वास त्याने व्यक्त केला.







