अवघ्या १५व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करून सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या वैभव सूर्यवंशीबाबत भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज ईशान किशनने महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. ड्रेसिंग रूममधील सर्व वरिष्ठ खेळाडू वैभवने सोशल मीडियापेक्षा क्रिकेटवर अधिक लक्ष केंद्रित करावे, यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्याने सांगितले.
झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यानंतर पत्रकार परिषदेत ईशान म्हणाला, “वैभव खूप समजूतदार आहे. त्याला काय करायचे, कशी फलंदाजी करायची आणि मैदानावर तसेच मैदानाबाहेर कसे वागायचे हे चांगले माहीत आहे. मात्र, तो ज्या पार्श्वभूमीतून आला आहे, तिथे लक्ष विचलित करणाऱ्या अनेक गोष्टी असू शकतात.”
तो पुढे म्हणाला, “भारताचे प्रतिनिधित्व करताना कोणत्या गोष्टींवर लक्ष द्यावे, याचा मला अनुभव आहे. त्यामुळे मीच नव्हे, तर अभिषेक शर्मा, अक्षर पटेल आणि इतर खेळाडूही वैभवशी बोलताना त्याने सोशल मीडियाऐवजी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करावे, अशीच काळजी घेतो. बाहेर काय बोलले जाते किंवा सोशल मीडियावर काय सुरू आहे, यापेक्षा त्याने आपल्या खेळावर लक्ष द्यावे.”
दरम्यान, दुसऱ्या टी-२० सामन्यात ईशान किशनने ४४ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ८१ धावांची धडाकेबाज खेळी केली. तिलक वर्मानेही २९ चेंडूत नाबाद ६० धावा केल्या. या दोघांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारताने २० षटकांत ५ बाद २१९ धावा उभारल्या आणि झिम्बाब्वेवर मोठा विजय मिळवला.







