भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकपसाठी इंग्लंडमध्ये आहे. २२ वर्षीय वेगवान गोलंदाज क्रांति गौड हिचाही भारतीय संघात समावेश आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील क्रांती गौड हिचा भारतीय संघापर्यंतचा प्रवास संघर्षाने भरलेला आहे.
क्रांतीने सांगितले, “क्रिकेट खेळण्याबाबत मी इतके मोठे स्वप्न कधी पाहिले नव्हते. मी अशा गावातून आले आहे, जिथे मुलींना मोकळेपणाने बाहेर जाण्याचीही परवानगी नसते. मुलींनी बाहेर जाण्याचा किंवा काही करण्याचा प्रयत्न केला तर लोकांच्या टोमण्यांना आणि टीकेला सामोरे जावे लागते.”
ती पुढे म्हणाली, “मी नेहमी ऐकले आहे की जे लोक कठोर मेहनत करत राहतात ते कधीही हरत नाहीत. मी फक्त पुढे जात राहिले. गोलंदाजी करत राहिले, शिकत राहिले आणि स्वतःवर विश्वास ठेवला. माझ्या आजूबाजूच्या नकारात्मक बोलण्यामुळे मी कधी थांबले नाही. मी सतत मेहनत करत राहिले. आज मी या टप्प्यावर आहे आणि टी-२० विश्वचषकात ही जर्सी घालून देशाचे प्रतिनिधित्व करत आहे. या स्तरावर पोहोचल्यावर वाटते की माझी सर्व मेहनत सार्थकी लागली.”
हे ही वाचा:
अमेरिकेच्या चाळ्यामुळे जवळ आले भारत-चीन
‘लिओनेल मेस्सी सर्वात महान फुटबॉलपटू’
नार्वेकरांनी शोकप्रस्तावाच्या कागदातून भेळ खाल्ली होती का?
भारताची सर्व राफेल सुस्थितीत, पाकिस्तानचा दावा पडला खोटा
आपल्या आई-वडिलांच्या त्यागाबद्दल बोलताना क्रांती म्हणाली, “जर तुमचे कुटुंब तुमच्या पाठीशी उभे असेल, तर इतर लोक काय बोलतात याने काही फरक पडत नाही. बाहेरचे लोक तुमची मदत करत नसतात. माझे आई-वडील वेगळे होते. माझ्या कुटुंबातील प्रत्येकाने मला नेहमी साथ दिली. त्यांनी मला कधीही असे वाटू दिले नाही की मी काही चुकीचे करत आहे. त्यांना माझ्या स्वप्नावर विश्वास होता. त्या पाठिंब्यामुळेच सर्व काही बदलले.”
क्रांती पुढे म्हणाली, “खूप अडचणी होत्या. मला सामने खेळण्यासाठी बाहेर जावे लागायचे. पैशांची नेहमीच कमतरता असायची. माझ्या आईने माझ्यासाठी चांगला क्रिकेट किट खरेदी करण्यासाठी स्वतःचे दागिने विकले. तो खूप मोठा त्याग होता. माझे कुटुंब माझ्यासाठी खूप काही करत होते. त्यामुळे माझ्यावर जबाबदारी असल्याची जाणीव झाली. मला त्यांना काहीतरी परत द्यायचे होते. त्यांच्या त्यागाचे चीज करायचे होते.”
गौड म्हणाली, “वनडे विश्वचषकातील माझ्या कामगिरीमुळे माझ्या घुवारा गावात क्रिकेट अकादमी सुरू झाली आहे. अनेक तरुण मुली आता तिथे क्रिकेट खेळायला येत आहेत. हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. त्यांच्या पालकांचा आता आपल्या मुलींवर विश्वास बसत आहे आणि त्या या खेळात करिअर करू शकतात, असे त्यांना वाटू लागले आहे.” ती म्हणाली, “मी या मुलींना भेटत असते. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की त्यांनी स्वतःसाठी ठरवलेली सर्व उद्दिष्टे पूर्ण करावीत.”







