गल्लीतील टॅलेंट, ऑलिम्पिकचं टार्गेट; ‘खेलो इंडिया’चा मास्टरप्लॅन!

खेलो इंडियाचा विस्तार; ग्रामीण, आदिवासी आणि युवा खेळाडूंच्या स्वप्नांना मिळणार नवी उंची!

गल्लीतील टॅलेंट, ऑलिम्पिकचं टार्गेट; ‘खेलो इंडिया’चा मास्टरप्लॅन!
महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात दडलेल्या क्रीडा गुणवत्तेला शोधून त्यांना थेट आंतरराष्ट्रीय मंचावर पदकविजेते बनवण्यासाठी केंद्र सरकारने क्रीडा क्षेत्रातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या योजनेचा नारळ फोडला आहे. स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (SAI), प्रादेशिक केंद्र आयोजित प्रेस कॉन्फरन्समध्ये ‘खेलो इंडिया सुधारित योजना (२०२६-३१)’ ची अधिकृत घोषणा करण्यात आली.
या योजनेसाठी केंद्र सरकारने ३६,४४१ कोटी रुपयांच्या भरीव निधीची तरतूद केली आहे, जी पूर्वीच्या अर्थसंकल्पाच्या ८ पट आहे. याद्वारे देशातील खेळाडूंना मिळणाऱ्या मदतीत तब्बल १० पटीने वाढ करून ३०,००० खेळाडूंना थेट आंतरराष्ट्रीय दर्जाचे पाठबळ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेला साई मुंबईचे प्रादेशिक संचालक श्री पांडुरंग चाटे आणि सहाय्यक संचालक अंकित पाटील यांच्यासह भारताची मान उंचवणारे स्टार खेळाडू — पद्मश्री व खेलरत्न पुरस्कारार्थी प्रमोद भगत (पॅरा-बॅडमिंटन ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता), सुकांत कदम (जागतिक पॅरा-बॅडमिंटन सुवर्णपदक विजेता) आणि ऋतुजा भोसले (आशियाई खेळ सुवर्णपदक विजेती, टेनिस) प्रामुख्याने उपस्थित होते.
सुधारित योजनेचे ९ मुख्य स्तंभ :
१. ऑलिम्पिक केंद्रीत पायाभूत सुविधा : ऑलिम्पिक, आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून सध्याच्या मैदानांचे मॅपिंग केले जाईल व तुटवडा असलेल्या ठिकाणी नवी अद्ययावत मैदाने उभारली जातील.
२. मोक्याच्या क्रीडा मालमत्तांचे बळकटीकरण : देशातील व राज्यातील प्रमुख क्रीडा संकुलांचा कायापालट करून त्यांना जागतिक दर्जाच्या हाय-परफॉर्मन्स सेंटरमध्ये रूपांतरित केले जाईल.
३. ६०:४० मॉडेलनुसार राज्य कृती आराखडा : पायाभूत सुविधांच्या विकासात राज्यांची भूमिका वाढवली जाईल. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये ६०:४० असा खर्च विभागला जाईल. निधीची मंजुरी खेळाडूंची प्रगती व कामगिरीवर आधारित असेल.
४. वैज्ञानिक व डिजिटल गुणवत्ता शोध : ‘खेलो इंडिया उत्कृष्ट विद्यालये’, ‘फीडर स्कूल्स’ आणि ‘खेलो इंडिया सेंटर्स’च्या जाळ्याद्वारे शालेय आणि गल्लीबोळांतील खेळाडूंची वैज्ञानिक पद्धतीने निवड केली जाईल.
५. ३०,००० खेळाडूंना पूर्ण पाठबळ : ‘खेलो इंडिया ॲथलीट्स’ सोबत नव्याने ‘इमर्जिंग खेलो इंडिया ॲथलीट्स’ ही श्रेणी सुरू करण्यात आली आहे. खेळाडूंचा कोचिंग, आहार, निवास, किट, प्रवास, वैद्यकीय खर्च, क्रीडा विज्ञान आणि शिक्षणाचा संपूर्ण खर्च सरकार करेल.
६. स्पर्धांचा धमाका व अस्मिता लीग : युथ, युनिव्हर्सिटी, रिजनल आणि झोनल लीग्ससोबतच आता पॅरा गेम्स, विंटर गेम्स, बीच गेम्स, ट्रायबल गेम्स, वॉटर स्पोर्ट्स आणि महिलांसाठी विशेष ‘अस्मिता वूमन्स लीग’ चे नियमित आयोजन होईल.
७. कोचिंग व सपोर्ट स्टाफचे प्रोफेशनलायझेशन : प्रशिक्षकांचा तुटवडा भरून काढण्यासाठी ‘नॅशनल कोच ॲक्रेडिटेशन बोर्ड’ची स्थापना केली जाईल. खेळाडूंसाठी डॉक्टर्स, फिजियोथेरपिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ, न्यूट्रिशनिस्ट आणि बायोमेकॅनिस्ट यांची फौज उपलब्ध असेल.
८. हाय-टेक स्पोर्ट्स तंत्रज्ञान : खेळाडूच्या संपूर्ण प्रवासाचे ट्रॅकिंग करण्यासाठी एआय व्हिडिओ स्कॉटिंग, IoT वेअरेबल्स, परफॉर्मन्स ॲनालिटिक्स आणि करिअरनंतरच्या निवृत्ती व्यवस्थापनासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.
९. फिट इंडिया मूव्हमेंट २.० : कम्युनिटी फिटनेस हब, योग, पारंपरिक खेळ, तसेच महिला आणि दिव्यांगांचा क्रीडामंचावर सहभाग वाढवण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल.
हेही वाचा :

तेजस्विन शंकरसह १७ खेळाडूंचा अर्जुन पुरस्काराने गौरव

बाहेर जेवताना सावधान! ‘या’ ४ गोष्टी तपासा; FDA आयुक्तांचा सल्ला

चाकणचे खड्डे बुजणार; ३१ ऑगस्टपर्यंत रस्ते दुरुस्तीचे आदेश

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा; उन्नती हुड्डाचे विजयी पदार्पण

“महाराष्ट्र हे भारताचे क्रीडा पॉवरहाऊस आहे. मुंबईला हाय-परफॉर्मन्स स्पोर्ट्स हब बनवण्यासोबतच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात क्रीडा सुविधा पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे. या योजनेमुळे गल्लीतील खेळाडू थेट ऑलिम्पिकच्या पोडियमपर्यंत पोहचू शकेल.” — श्री पांडुरंग चाटे, प्रादेशिक संचालक, साई मुंबई.

“केवळ गुणवत्ता असून चालत नाही, तिला योग्य वयात योग्य सुविधा आणि स्पोर्ट्स सायन्सची साथ मिळणे गरजेचे असते. खेलो इंडियाच्या या सर्वसमावेशक आराखड्यामुळे विशेषतः पॅरा-ॲथलीट्सना फार मोठे पाठबळ मिळेल.” — प्रमोद भगत (पॅरा-बॅडमिंटन चॅम्पियन)

“खेळाडूला घडवण्यासाठी सिस्टीमने त्याच्या प्रवासात सतत गुंतवणूक करणे गरजेचे असते. लहान वयातच मिळणारी नियमित स्पर्धात्मक एक्सपोजर आणि कोचिंग तरुण खेळाडूंना ऑलिम्पिकची स्वप्ने पाहण्याचे धाडस देईल.” — सुकांत कदम (जागतिक विजेता)

“नियमित स्पर्धा आणि दर्जेदार क्रीडा सुविधांमुळे खेळाडूंचा आत्मविश्वास वाढतो. या योजनेमुळे महाराष्ट्रातील ग्रामीण खेळाडूंना आपल्या राहत्या घराच्या जवळच उत्तम प्रशिक्षण मिळेल.” — ऋतुजा भोसले (आशियाई खेळ सुवर्णपदक विजेती
Exit mobile version