भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली, डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादव आणि फील्डिंग कोच टी दिलीप यांनी शनिवारी उज्जैनमध्ये भगवान महाकालेश्वर मंदिर येथे जाऊन दर्शन घेतलं. तिघांनीही पहाटे होणाऱ्या भस्म आरतीत सहभाग घेत भगवान शिवाचं आशीर्वाद घेतलं. यावेळी मंदिर व्यवस्थापन समितीकडून विराट कोहलीचा विशेष सत्कारही करण्यात आला.
याआधी शुक्रवारी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल आणि फलंदाजी प्रशिक्षक सीतांशु कोटक हेही महाकालच्या दर्शनासाठी आले होते. सर्वांनी पहाटे चार वाजता भस्म आरतीत हजेरी लावली होती.
याबाबत बोलताना कुलदीप यादव म्हणाला, “हा अनुभव खूपच छान होता. संपूर्ण टीम इथे आली होती. महाकालाचं दर्शन नेहमीच वेगळं समाधान देतं. त्यांच्या कृपेने सगळं व्यवस्थित सुरू आहे. देव सगळ्यांवर अशीच कृपा ठेवो आणि सगळ्यांचं आयुष्य सुखी राहो, हीच प्रार्थना. आजचा दिवस खूप खास होता.”
हेही वाचा :
इंदौरमध्ये विराटचा विक्रमाचा डाव?
पीएमसीच्या पोर्टलवर नावांचा गोंधळ!
राज ठाकरेंचा फायदा इतरांना, पण मनसेची झोळी रिकामीच
महानगरपालिका निवडणुकीतील अपयशावर राज ठाकरे काय म्हणाले?
दरम्यान, मायकेल ब्रेसवेल यांच्या नेतृत्वाखाली, अनेक वरिष्ठ खेळाडूंशिवाय मैदानात उतरलेल्या न्यूझीलंड संघाने भारताला वनडे मालिकेत चांगलीच झुंज दिली आहे. तीन सामन्यांची ही मालिका सध्या १–१ अशी बरोबरीत आहे. ११ जानेवारीला वडोदऱ्यात झालेला पहिला सामना भारताने चार विकेट्सने जिंकला होता, तर १४ जानेवारीला राजकोटमध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा सात विकेट्सने पराभव केला.
आता रविवारी इंदौरच्या होलकर क्रिकेट स्टेडियम येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तिसरा आणि निर्णायक वनडे सामना होणार आहे. त्यामुळे हा सामना प्रचंड रंगतदार ठरण्याची शक्यता आहे.
दुसऱ्या वनडेत केएल राहुलने नाबाद शतक झळकावूनही भारताला पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आता निर्णायक सामन्यात चाहत्यांना कर्णधार रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. तसेच विराट कोहलीकडूनही निर्णायक सामन्यात ‘विराट’ खेळी पाहायला मिळेल, अशी आशा चाहत्यांनी व्यक्त केली आहे.







