इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा आरसीबी स्टार फलंदाज विराट कोहली याने आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात कोहलीने आयपीएलमध्ये ९,००० धावांचा टप्पा पार करत नवा विक्रम प्रस्थापित केला.
न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज मिशेल मॅक्लेनाघनने कोहलीच्या या कामगिरीचं कौतुक करत म्हटलं, “जगातील सर्वोत्तम गोलंदाजांविरुद्ध ९,००० धावा करणं सोपं नाही. त्यासाठी सातत्य, शिस्त आणि स्वतःला सतत बदलण्याची क्षमता लागते.”
त्याने पुढे सांगितले की, कोहलीने आपल्या करिअरमध्ये अनेक टप्प्यांवर बदल स्वीकारले. “सुरुवातीला तो ओपनर नव्हता. खालच्या फळीपासून सुरुवात करून तो तिसऱ्या क्रमांकावर स्थिरावला आणि नंतर क्रिस गेलसोबत ओपनिंग करत त्याच्या खेळात मोठा बदल झाला,” असे मॅक्लेनाघन म्हणाला.
विशेष म्हणजे, विराट कोहली हा आयपीएल इतिहासात ९,००० धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे आणि त्याने या सर्व धावा केवळ आरसीबीसाठी खेळताना केल्या आहेत. २००८ पासून तो सातत्याने या संघाचा भाग आहे.
आकडेवारीनुसार, कोहलीने आतापर्यंत २७५ सामन्यांच्या २६७ डावांत ८ शतकं आणि ६६ अर्धशतकांसह ९,०१२ धावा केल्या आहेत. आयपीएल २०२६ मध्येही त्याने ८ सामन्यांत ३५१ धावा करत शानदार फॉर्म कायम ठेवला आहे.
मॅक्लेनाघनच्या मते, “कोहली लवकरच १०,००० धावांचा टप्पाही गाठेल. तो फक्त धावांमुळेच नव्हे, तर प्रत्येक टप्प्यावर स्वतःला बदलत सातत्य राखल्यामुळे आयपीएल इतिहासातील महान फलंदाज आहे.”







