आयपीएल २०२६ मध्ये लखनौ सुपर जायंट्सला राजस्थान रॉयल्सविरुद्ध ४० धावांनी पराभवाचा धक्का बसला. या सामन्यात एलएसजीचा कर्णधार ऋषभ पंत पुन्हा एकदा फलंदाज आणि नेता म्हणून अपयशी ठरला. त्याच्या फलंदाजीवर माजी क्रिकेटपटू संजय बांगड यांनी थेट टीका करत शॉट निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
स्टार स्पोर्ट्सवरील चर्चेत बोलताना बांगड म्हणाले, “पंतने डावाच्या सुरुवातीलाच चुकीचे शॉट्स खेळले. पहिल्याच तीन चेंडूंवर त्याने वारंवार मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, जो योग्य वाटत नव्हता. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनुभव असलेल्या टॉप-ऑर्डर फलंदाजाकडून अशी अपेक्षा नसते. त्याची बॉडी लँग्वेजच सांगत होती की त्याला स्वतःच्या चुकीची जाणीव झाली होती. सुरुवातीलाच जर त्याने अधिक स्पष्ट रणनीती ठेवली असती, तर निकाल वेगळा लागला असता.”
दरम्यान, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या सामन्याबाबत बांगड यांनी मुंबईच्या कामगिरीचे कौतुक केले. “मुंबईसाठी आत्मविश्वासाचा प्रश्न नाही. क्विंटन डी कॉक आणि तिलक वर्मा यांनी शतके झळकावली आहेत. जसप्रीत बुमराहची नव्या चेंडूवरील गोलंदाजी प्रभावी आहे. स्पिनर्सनीही चांगली साथ दिली आहे. विल जॅक्सच्या उपलब्धतेमुळे संघ अधिक संतुलित होत आहे,” असे त्यांनी सांगितले.
रोहित शर्माच्या पुनरागमनाबाबत बोलताना बांगड म्हणाले, “रोहितला इम्पॅक्ट प्लेअर किंवा फलंदाज म्हणून का होईना, पण संघात घेणे गरजेचे आहे. मजबूत सुरुवात मिळाली तर मधल्या फळीवरील दबाव कमी होईल.”
रोहित शर्मा दुखापतीमुळे मागील दोन सामन्यांना मुकला होता. मात्र चेन्नईविरुद्धच्या सामन्यापूर्वी तो सराव करताना दिसल्याने त्याच्या पुनरागमनाची शक्यता वाढली आहे.







