महिला एकदिवसीय विश्वचषकासाठी आता अवघे काही दिवस बाकी आहेत. यजमान भारत आणि श्रीलंका यांच्यातील रोमांचक सामन्याने स्पर्धेची सुरुवात होणार आहे. तर विजेतेपदाचा सामना २ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
महिला विश्वचषकाचा उद्घाटन सामना बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. पणबंगळुरू महिला एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद गमावू शकण्याची शक्यता आहे. बीसीसीआय सुरुवातीला बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणाऱ्या महिला विश्वचषक सामन्यांचे ठिकाण बदलू शकते.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या पहिल्या आयपीएल जेतेपदाच्या जल्लोषाच्या एक दिवसानंतर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला जाऊ शकतो. ठिकाणाबाबत अंतिम निर्णय या आठवड्यात येऊ शकतो. बीसीसीआयने सामने आयोजित करण्यासाठी पोलिसांची परवानगी मिळविण्यासाठी १० ऑगस्टची अंतिम मुदत ओलांडल्यानंतर एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सामने गमावण्याचा धोका आहे.
बंगळुरूला वगळल्यास तिरुअनंतपुरममधील ग्रीनफील्ड स्टेडियम हा पर्याय म्हणून विचारात घेण्यात आला आहे. सध्याच्या वेळापत्रकानुसार बंगळुरूमध्ये ३० सप्टेंबर रोजी भारत आणि श्रीलंका यांच्यातील सलामीचा सामना, ३ ऑक्टोबर रोजी इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, २६ ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध बांगलादेश, ३० ऑक्टोबर रोजी दुसरा उपांत्य सामना आणि २ नोव्हेंबर रोजी अंतिम सामना होणार आहे.
ही स्पर्धा ३० सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे. ग्रीनफील्ड स्टेडियममध्ये २१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान केरळ क्रिकेट लीग आयोजित करण्याचे आधीच नियोजन आहे. पण जर विश्वचषक सामने तेथे हलवले गेले तर केसीएल दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची योजना त्यांनी आधीच आखली आहे.
आयसीसीच्या नियमांनुसार स्पर्धा सुरू होण्याच्या किमान एक महिना आधी यजमान स्थळे आयोजकांना सोपवावी लागतात. याचा अर्थ असा की बीसीसीआय आणि आयसीसीला एका आठवड्यात निर्णय घ्यावा लागणार आहे.
विशेषतः तिरुवनंतपुरममध्ये २५ आणि २७ सप्टेंबर रोजी विश्वचषक सराव सामने आयोजित करण्याचा प्रस्ताव असल्याने. शेवटचा उपाय म्हणून मर्यादित प्रेक्षकांच्या क्षमतेसह विश्वचषक सामने आयोजित करण्याची शक्यताही तपासली जात आहे. बीसीसीआय हा प्रस्ताव स्वीकारेल की नाही हे स्पष्ट नाही.







