गेल्या काही वर्षांत जगभरात मोठी भूराजकीय उलथापालथ सुरू आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिका भारताच्या वाकड्यात शिरल्याचे चित्र आपण पाहातो आहोत. युरोपातील काही देश खलिस्तानी देशबुडव्यांना पदराखाली घेत आहेत. अमेरिका-युरोपातील काही राजकीय नेते तर भारताबाबत कायम असूयेने बोलत असतात. जगातील देशांना भारताची इतकी धास्ती का वाटते? हे भय नेमके कसले आहे? केंद्रीय मंत्री अश्विनी यांना ज्यांनी दोन दिवसांपूर्वी ऐकले त्यांना या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. ते जे काही बोलले ते जागतिक महासत्तांसाठी भूकंपापेक्षा कमी नाही. त्यांनी जे सांगितले त्याचा अर्थ येत्या दहा वर्षात भारत सिलिकॉन वेफर्स क्षेत्राचा भारत दादा बनतो आहे. विविध क्षेत्रात भारताची सुरू असलेली आगेकूच विदेशातील लोकांना खूपते हे आपण समजू शकतो, राहुल गांधी यांच्यासारखे नेतेही यात मागे नाहीत. भारतात आयफोन बनतात, भारत आयफोन आणि मोबाईल फोनची निर्यात करतो, हा केंद्र सरकारचा दावा वारंवार ऐकून बहुधा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे डोके ठणकले असावे. कारण त्यांनी काही दिवसांपूर्वी एक्सवर एक पोस्ट अपलोड केली होती. ‘देशात टीव्ही आणि आयफोनचे पार्ट बाहेरून येतात. देशाला मॅन्यूफॅक्चरींग पावर बनवण्यासाठी, चीनला थेट टक्कर देण्यासाठी तळागाळापर्यंत मोठे बदल करण्याची गरज आहे’, असे सांगून राहुल गांधी यांनी आपण निर्मिती करत नाही फक्त जोडकाम करतो हे सांगण्याचा प्रयत्न केला. थोडक्यात केंद्र सरकारच्या दाव्यातील हवा काढण्याचा प्रयत्न केला. लोकांच्या मनात गोंधळ निर्माण करण्यासाठी राहुल गांधी हे बोलत असतात ही बाब मान्य केली तरी तंत्रज्ञान क्षेत्रात भारत नेमका कुठे आहे ? राहुल बाबा म्हणतात ते कितपत खरे आहे, याचे उत्तर सर्वसामान्य माणसाला ठाऊक असण्याचे काही कारणच नाही.



