जम्मू-काश्मीरमधील निसर्गरम्य पहलगाम परिसरात झालेल्या ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणावर हाहाकार माजला आहे. मुसळधार पावसानंतर आलेल्या अचानक पुरामुळे अनेक शेतजमिनी पाण्याखाली गेल्या, तर रस्ते आणि संपर्कमार्ग वाहून गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची अधिकृत माहिती समोर आलेली नसली, तरी स्थानिक प्रशासनाने सतर्कता वाढवून मदत आणि बचावकार्य सुरू केले आहे.
दरम्यान, उत्तराखंडमधील विकासनगर परिसरातही मुसळधार पावसामुळे लखवार जलविद्युत प्रकल्पाजवळ मोठे भूस्खलन झाले. या दुर्घटनेत अनेक वाहने आणि बांधकामासाठी वापरली जाणारी यंत्रसामग्री मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. प्रशासनाने घटनास्थळी सुरक्षा उपाय अधिक कडक केले असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
हे ही वाचा:
ब्रेकनंतर मान्सूनचे दणक्यात पुनरागमन होणार
पहिल्या हायड्रोजन ट्रेनचा प्रवास ८९ किलोमीटर
डोक्यावरील केस कापले, गोमुत्र प्यायला दिले… विनायक राऊतांच्या सुनेची तक्रार
देशातील मान्सूनची स्थितीही सध्या अनिश्चित बनली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सूनला सक्रिय ठेवणाऱ्या प्रणाली कमकुवत झाल्यामुळे देशाच्या सुमारे ७० टक्के भागातून मान्सूनचे ढग कमी झाले आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस राजस्थान, दिल्ली-एनसीआर, पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
तज्ज्ञांच्या मते, पॅसिफिक महासागरात तयार होत असलेल्या हवामान प्रणाली पुढील काही दिवसांत बंगालच्या उपसागरात पोहोचल्यास १८ ते २५ जुलैदरम्यान देशात मान्सूनची दुसरी प्रभावी फेरी सुरू होऊ शकते. तोपर्यंत अनेक राज्यांमध्ये उष्णतेची तीव्रता वाढण्याची शक्यता असून, नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







