मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील नेशनल स्टॉक एक्सचेंजच्या एम्फीथिएटरमध्ये आयोजित भव्य सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार आणि न्यूज कंटीन्यूअसचे संपादक डॉ. मयूर पारिख यांना प्रतिष्ठेचा ‘देवर्षि नारद पत्रकारिता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. विश्व संवाद केंद्र, मुंबईतर्फे माध्यम क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पत्रकारांचा गौरव करण्यात आला असून यंदा या पुरस्काराचे २६वे वर्ष होते.
या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय लोकनीती तज्ज्ञ आणि प्रसिद्ध लेखक संदीप वासलेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी भारतीय संस्कृतीतील ‘वसुधैव कुटुंबकम’ या विचाराची महत्ता अधोरेखित करत, “जिथे संस्कृती आहे तिथे संघर्षाला स्थान नसते,” असे सांगितले. जगभरात भारताच्या सर्वसमावेशक विचारांना दबावाखाली आणण्याचे प्रयत्न होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
हे ही वाचा:
‘देव देश आणि धर्म’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा
तैवान प्रश्नात हस्तक्षेप करू नका; चीनचा अमेरिकेला स्पष्ट इशारा
कोलकाताचे माजी डीसीपी शंतनू सिन्हा बिस्वास यांना अटक
साखर निर्यातीवर बंदी; देशातील दर नियंत्रणासाठी केंद्राचा मोठा निर्णय
पत्रकारितेतील दीर्घ आणि प्रभावी कारकिर्दीसाठी डॉ. मयूर पारिख यांचा विशेष सन्मान करण्यात आला. गेली २५ वर्षे त्यांनी माध्यम क्षेत्रात कार्य करत झी न्यूज आणि एबीपी न्यूजसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांनी देशातील २५ हून अधिक निवडणुकांचे प्रत्यक्ष ग्राउंड रिपोर्टिंग केले असून सध्या ते डिजिटल मीडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांच्या अभ्यासपूर्ण आणि धाडसी पत्रकारितेची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याच कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार गणेश उर्फ भाऊ तोरसेकर यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच विविध श्रेणींमध्ये अनेक पत्रकार आणि सोशल मीडिया क्षेत्रातील मान्यवरांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले लेफ्टनंट जनरल (नि.) आर. आर. निंभोरकर यांनी भारताच्या वाढत्या संरक्षण क्षमतेवर भाष्य करत देशाचा शस्त्रास्त्र निर्यात व्यवसाय ३० हजार कोटी रुपयांच्या पुढे गेल्याचे सांगितले. प्रमुख वक्ते प्रशांत पोळ यांनी संवाद हीच भारतीय संस्कृतीची खरी ओळख असल्याचे सांगत संवाद हा युद्धापेक्षा श्रेष्ठ असल्याचे मत व्यक्त केले.
विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष सुधीर जोगळेकर यांनी समाजहित आणि राष्ट्रहित जपणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करणे हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. निशिथ क. भांडारकर यांच्या प्रास्ताविकाने झाली, तर समारोप चंद्रशेखर वझे यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.







