पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय तणाव वाढलेला असताना सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत. निवडणूक ड्युटीवर तैनात आयपीएस अधिकारी आणि पोलीस पर्यवेक्षक अजय पाल शर्मा यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ते तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान यांच्या समर्थकांकडून मतदारांना धमकावल्याच्या तक्रारींवर कडक इशारा देताना दिसतात. या व्हिडिओमध्ये ते म्हणताना दिसतात, “जर कोणी गुंडगिरी (बदमाशी) केली, तर त्याच्यावर कायद्याने कारवाई केली जाईल.”
यानंतर तृणमूल काँग्रेसने निवडणूक ड्युटीवर तैनात असलेले आयपीएस अधिकारी अजय पाल शर्मा यांना इशारा दिला आहे. पक्षाने आरोप केला आहे की, त्यांची नियुक्ती राजकीय हेतूंनी प्रेरित आहे आणि त्यांनी निष्पक्ष पर्यवेक्षकाच्या भूमिकेपलीकडे जाण्याचा प्रयत्न केल्यास त्याला राजकीय विरोध केला जाईल.
दक्षिण २४ परगणा येथे निवडणूक निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या अजय पाल शर्मा यांनी अलीकडेच टीएमसी उमेदवाराकडून गुंड पाठवून मतदारांना धमकावल्याच्या आरोपांवर आक्षेप घेतला होता. यासंदर्भातील त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये अजय पाल शर्मा टीएमसी उमेदवाराच्या अनुपस्थितीत मतदारांना धमकावणाऱ्यांना इशारा देताना दिसतात. या व्हिडिओमध्ये ते म्हणताना दिसतात, “जर कोणी गुंडगिरी केली, तर त्याच्यावर कायद्याप्रमाणे कारवाई केली जाईल.”
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, स्थानिक नागरिकांनी आरोप केला होता की, तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान यांचे समर्थक मतदारांना धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत. या तक्रारींनंतर अजय पाल शर्मा घटनास्थळी पोहोचले. उमेदवाराच्या घरात उपस्थित कुटुंबीयांना संबोधित करताना शर्मा यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला. ते म्हणाले, “त्यांना नीट समजावून सांगा. जर लोकांना धमकावल्याच्या तक्रारी येत राहिल्या, तर आम्ही त्यावर योग्य कारवाई करू. कोणीही चुकीचे काम केले किंवा मतदारांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही कठोर पावले उचलू.” हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून तो राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.
हे ही वाचा:
पीडित कुटुंबीयांच्या अटकेने घाटकोपर अत्याचार प्रकरण तापले
“भारताला एका सहीवर तेल मिळतं, पाकिस्तानला नाही!”
बदमाशी केलीत, तर कायद्याचा दंडुका… बंगालमधील पोलिस अधिकाऱ्याचा व्हीडिओ व्हायरल
तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी भाजपा उमेदवाराच्या घरावर टाकला बॉम्ब
यानंतर टीएमसी प्रवक्ते रिजू दत्ता यांनी थेट धमकी देत म्हटले, “४ मेनंतर भाजपही तुम्हाला वाचवू शकणार नाही.” त्यांनी अधिकाऱ्यावर पक्षपातीपणाचा आरोप करत कोणतीही अतिरिक्त कारवाई सहन केली जाणार नाही आणि त्याला राजकीय उत्तर दिले जाईल, असेही सांगितले.
टीएमसीने २०२० मधील कथित ‘कॅश-फॉर-पोस्टिंग’ प्रकरणासह इतर काही आरोपांचाही उल्लेख केला आहे, ज्यामध्ये शर्मा यांचे नाव समोर आले होते. तसेच एका महिलेने केलेल्या वैयक्तिक गैरवर्तनाच्या आरोपांचाही हवाला देण्यात आला आहे. मात्र, शर्मा यांनी या सर्व आरोपांना पूर्वीच नाकारले असून ते वरिष्ठ पदांवर कार्यरत राहिले आहेत.







