बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्ये पावसाशी संबंधित घटनांमध्ये १०० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. तर अनेक जण जखमी झाले आहेत. या पावसामुळे कडक उन्हापासून दिलासा मिळाला. मात्र, मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि नुकसान झाले आहे.
बिहारमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये वीज पडून आणि गारपिटीमुळे ८० जणांचा मृत्यू झाला आहे. आपत्ती मंत्री विजय मंडल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृतांच्या कुटुंबियांना ४ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. तथापि, राजद नेते तेजस्वी यादव यांनी मृतांचा आकडा ५० पेक्षा जास्त असल्याचा दावा केला आणि राज्याने बाधित शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी केली.
दरभंगा, नालंदा आणि पटनासह राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. शुक्रवार आणि शनिवारी या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत पटनामध्ये ४२.६ मिमी पावसाची नोंद झाली, ज्यामुळे अनेक भागात पाणी साचले आहे.
हे ही वाचा :
आयपीएलच्या इतिहासात रचला “विराट” विक्रम
विमानतळावर पोहोचताच मोदींनी प्रथम घेतली वाराणसी बलात्कार प्रकरणाची दखल
वांद्रे येथे ड्रग्सच्या वादातून एका कुटूंबावर हल्ला; एकाचा मृत्यु
जम्मू- काश्मीरमधील किश्तवाडमध्ये दहशतवाद्याला घातले कंठस्नान
उत्तर प्रदेशातील १५ जिल्ह्यांमध्ये पावसाशी संबंधित वेगवेगळ्या घटनांमध्ये २२ जण दगावले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना मदतकार्य जलद करण्याचे आणि मृतांच्या नातेवाईकांना ४ लाख रुपयांची भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच त्यांनी पिकांच्या नुकसानीचे मूल्यांकन, गव्हाची सुरक्षित साठवणूक आणि पाणी साचलेल्या भागात तातडीने पाण्याचा निचरा करण्याचे आवाहन केले आहे.
झारखंडमध्ये वीज कोसळून चार जण जखमी झाले आहेत. धनबाद, हजारीबाग आणि कोडरमाच्या काही भागात मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले आणि झाडे उन्मळून पडली. डाल्टनगंजमध्ये ३१.८ मिमी पाऊस पडला, तर रांचीमध्ये ७.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.