दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मागील शुक्लकाष्ठ काही संपण्याची दिसत नाहीत. राज्यात अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षेची नोंदणी सुरू झाली आहे. मात्र, पहिल्याच दिवशी नोंदणी करताना विद्यार्थ्यांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला. संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी बैठक क्रमांक टाकल्यावर तेथे येणारी गुणपत्रिका आणि मूळ गुणपत्रिकेची जुळवाजुळव होत नसल्याने राज्य शिक्षण मंडळावर आता संकेतस्थळातच दुरुस्ती करण्याची वेळ आली आहे. शिक्षण क्षेत्रातही ठाकरे नापास ठरल्याची टीका आता होऊ लागली आहे.
ठाकरे सरकारच्या राज्यात एकीकडे सर्वच क्षेत्रातील प्रवेश परीक्षा तसेच अंतिम परीक्षांचा घोळ कायम असताना, अकरावी प्रवेश परीक्षाही आता अडचणीत आहे. सीईटी देण्यासाठी असलेले संकेतस्थळ बंद असल्यामुळे विद्यार्थी आणि पालक दोघेही चांगलेच धास्तावले आहेत. सीईटी ऐच्छिक असे शिक्षणमंत्री म्हणतात, पण महाविद्यालये मात्र सीईटी द्यावीच लागेल यावर ठाम असल्यामुळे आता गोंधळाचे वातावरण अधिक वाढले आहे.
हे ही वाचा:
रेल्वे सर्वसामान्यांना खुली करण्यासाठी दबाव वाढला
ठाण्यात खड्ड्यांमुळे प्रवाशांचे मोडले कंबरडे
पंचवटी, राज्यराणी एक्स्प्रेस रखडल्या
अनिल देशमुख, ठाकरे सरकारला उच्च न्यायालयाचा दणका
अकरावीच्या प्रवेशाच्या हेतूने विद्यार्थ्यांसाठी सीईटी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु ती केवळ विद्यार्थ्यांसाठी पर्यायी अर्थात ऐच्छिक परीक्षा असणार आहे. सीईटी २०२१ यंदा २१ ऑगस्टला घेण्यात येणार आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी निकालाच्या संकेतस्थळामध्ये प्रचंड तांत्रिक गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर आता सीईटी संकेतस्थळावरही गोंधळच गोंधळ सुरु आहे. संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असता, मूळ गुणपत्रिका तसेच संकेतस्थळावर देण्यात येणाऱ्या गुणपत्रिकेमध्ये फरक असल्याचे दिसून आले. तर काही विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचा प्रयत्न केला असता संकेतस्थळामध्ये अनेकदा ‘एरर’ येत असल्याने अर्जच करता आला नाही. त्यामुळे संकेतस्थळाची योग्य तपासणी न करता मंडळाने अर्ज नोंदणीला सुरुवात कुठल्या आधारावर केली, असा सवालही उपस्थित केला जात आहे.







