आरोग्य खर्च वाटपाचा ३०-३०-३०-१० फॉर्म्युला; परवडणाऱ्या आरोग्यसेवेसाठी प्रस्ताव

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षांचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र

आरोग्य खर्च वाटपाचा ३०-३०-३०-१० फॉर्म्युला; परवडणाऱ्या आरोग्यसेवेसाठी प्रस्ताव

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा मुंबईचे माजी उपमहापौर राजेश शर्मा यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांना पत्र पाठवून देशातील आरोग्य व्यवस्था अधिक परवडणारी, पारदर्शक आणि शाश्वत करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. २२ जून रोजी पाठविलेल्या पत्रात राजेश शर्मा यांनी वाढते उपचार खर्च, आरोग्यसेवेची उपलब्धता आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांवरील वाढता ताण याकडे लक्ष वेधले आहे. चांगल्या आरोग्य व्यवस्थेसाठी प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, लसीकरण, मातृ-बाल आरोग्य तसेच ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजारांच्या रुग्णांसाठी दीर्घकालीन उपचारांवर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

आयुष्मान भारत आणि पीएम-जयसारख्या योजनांचा उल्लेख करताना शर्मा यांनी देयकांमधील विलंब, अपुरे उपचारदर, गैरव्यवहार आणि पारदर्शकतेच्या अभावामुळे योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत अडथळे निर्माण होत असल्याचे म्हटले आहे. आरोग्यसेवेचा संपूर्ण आर्थिक भार केवळ सरकारवर टाकणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी खर्च वाटपाचा नवा फॉर्म्युला सुचवला आहे. त्यानुसार ३० टक्के खर्च सरकार, ३० टक्के विमा कंपनी, ३० टक्के नियोक्ता आणि १० टक्के रुग्ण किंवा त्याचे कुटुंबीय यांनी उचलावा. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना रुग्णालये आणि डॉक्टरांनी १० टक्के सवलत देणे अनिवार्य करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.

हे ही वाचा:

सोन्या-चांदीत मोठी घसरण!

एआयमुळे ओरॅकलने काढले वर्षभरात २१ हजार कर्मचारी

पाकिस्तानविरोधी आंदोलनासाठी पीओकेमध्ये शाळकरी मुले, महिला रस्त्यावर

कतारमधील भारतीयांच्या मृत्यूवर जयशंकर यांनी व्यक्त केला शोक

देशाची आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम आणि दीर्घकालीनदृष्ट्या टिकाऊ करण्यासाठी केंद्र सरकारने या सूचनांचा गांभीर्याने विचार करावा, अशी विनंती शर्मा यांनी पत्राद्वारे केली आहे. पत्राच्या प्रती संसदीय आरोग्य स्थायी समितीचे अध्यक्ष रामगोपाल यादव आणि सदस्य शोभा बच्छाव यांनाही पाठविण्यात आल्या आहेत. तसेच सरकारकडून वैद्यकीय खर्चाची रक्कम वेळेवर न मिळाल्यास करदात्यांना त्या खर्चावर आयकर सवलत देण्याचाही प्रस्ताव शर्मा यांनी मांडला आहे. त्यामुळे नागरिकांवरील आर्थिक ताण कमी होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

आपल्या सूचनांचा सविस्तर विचार करून भारताची आरोग्य व्यवस्था अधिक मजबूत, न्याय्य आणि दीर्घकालीनदृष्ट्या टिकाऊ करण्यासाठी आवश्यक निर्णय घ्यावेत, अशी विनंती शर्मा यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांना केली आहे.

Exit mobile version