पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामधील ताराताला परिसरात बुधवारी (२४ जून) मोठी दुर्घटना घडली. बांधकाम सुरू असलेल्या एका कारखान्याचे शेड अचानक कोसळल्याने किमान १४ कामगार जखमी झाले असून अनेक कामगार अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर प्रशासन, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांनी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले आहे.
माहितीनुसार, ताराताला येथील एका बांधकामाधीन फॅक्टरी शेडमध्ये काम सुरू असताना अचानक प्रचंड लोखंडी बीम आणि काँक्रीटचे स्लॅब कोसळले. काही क्षणांतच संपूर्ण रचना जमीनदोस्त झाली आणि तेथे काम करणारे अनेक मजूर ढिगाऱ्याखाली अडकले. दुर्घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी आणि सहकारी कामगारांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. त्यानंतर अग्निशमन दल, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथके आणि वैद्यकीय मदत पथके घटनास्थळी दाखल झाली.
आतापर्यंत १४ जखमी कामगारांना ढिगाऱ्यातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी चौघांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र घटनेच्या वेळी इमारतीत नेमके किती कामगार उपस्थित होते, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नसल्याने अडकलेल्या व्यक्तींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, बचाव पथके ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना आतून मदतीसाठी ओरडण्याचे आवाज ऐकू येत होते. त्यामुळे बचावकार्य अधिक वेगाने सुरू करण्यात आले आहे. एका प्रत्यक्षदर्शीच्या मते, इमारतीच्या तळमजल्यावर बांधकामाचे काम सुरू होते, तर पहिला आणि दुसरा मजला आरसीसी संरचनेसह जवळपास पूर्ण झाला होता. अचानक संपूर्ण रचना कोसळल्याने कामगारांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही.
हे ही वाचा:
“राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला शुभेंदू अधिकारींनी खूप मदत केली”
महापौरांच्या पाहणीदरम्यानच महानगरपालिका कर्मचारी पडला उघड्या गटारात
युक्रेनमध्ये भारतीय सैनिक? ट्रम्प यांनी प्रस्ताव फेटाळला
इराणमध्ये परिस्थिती सुधारतेय, पण सावध राहा!
दरम्यान, पश्चिम बंगाल सरकारने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी नबन्ना येथील राज्य सचिवालयात विशेष नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. विविध विभागांमध्ये समन्वय साधून बचावकार्य अधिक प्रभावी करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित गोदामाचे बांधकाम गेल्या सहा ते सात महिन्यांपासून सुरू होते. ही जागा बेहरा ब्रदर्स कन्स्ट्रक्शनचे शंभू बेहरा यांच्या मालकीची असल्याचे सांगितले जात असून स्थानिक पातळीवर प्रभावशाली मानले जाणारे अजगर खान या प्रकल्पाचे विकसक होते. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासात काँक्रीट ओतण्याचे काम सुरू असताना शेड कोसळल्याचे सांगितले आहे. तसेच निकृष्ट दर्जाच्या बांधकाम साहित्याचा वापर झाला होता का, याचाही तपास केला जाणार आहे.
