जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांचे रक्षण करताना आपला जीव गमावलेल्या सय्यद आदिल हुसेन शाह यांच्या वडिलांनी म्हटले की, पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांवर लष्कराच्या कारवाईने त्यांच्या मुलाच्या हत्येचा बदला घेतला आहे. भारताच्या कारवाईवर शाह यांचा कुटुंबीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सशस्त्र दलांचे आभार मानले आहेत.
आदिल हुसेन शाह पहलगामच्या बैसरनमध्ये पर्यटकांना खेचरांच्या सवारीवर घेऊन जायचा. २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांच्या गोळीबारात त्याचाही मृत्यू झाला. दरम्यान, भारताच्या कारवाईवर वडील सय्यद हैदर शाह म्हणाले, लष्कर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ लोकांच्या हत्येचा बदला घेतल्याबद्दल आज मला खूप आनंद होत आहे. पहलगाम हल्ल्यात मारले गेलेल्यांच्या आत्म्यांना आज शांती मिळेल.
सय्यद आदिल यांच्या भावानेही प्रतिक्रिया दिली. सय्यद नौशाद म्हणाले की, पंतप्रधानांनी त्यांना आणि इतर २५ कुटुंबांना न्याय दिला आहे. नौशाद म्हणाले, “आता, माझ्या भावाच्या आणि इतर २५ निष्पाप लोकांच्या आत्म्याला शांती मिळेल. आज सकाळी जेव्हा मला कळाले की मोदींनी हत्येचा बदला घेतला आहे, तेव्हा मला आनंद झाला. आता आम्हाला न्याय मिळाला आहे आणि आम्ही खूप आनंदी आहोत.”
हे ही वाचा :
हनुमानाच्या आदर्शांचं पालन करत घेतला बदला
राज ठाकरे काय बोलतात याला काही महत्व नाही!
विवेक ओबेरॉय म्हणतो, अश्रूंचा बदला घेतला
दरम्यान, २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सशस्त्र दलांनी पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी छावण्यांवर क्षेपणास्त्र हल्ले केले, ज्यात बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदचा बालेकिल्ला आणि मुरीदके येथील लष्कर-ए-तोयबाचा अड्डाचा समावेश आहे. भारताच्या कारवाईत लष्कर ए तोयबाच्या प्रमुख कमांडरसह अनेक दहशतवादी मारले गेले आहेत.