भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) खाद्य व्यवसाय चालवणाऱ्या सर्व व्यावसायिकांना तात्काळ प्रभावाने खाद्यपदार्थांचे पॅकिंग करताना धातूच्या पिन, स्टेपल पिन, वायर किंवा तत्सम वस्तूंचा वापर बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. ग्राहकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. एफएसएसएआयने म्हटले आहे की, सजावटीच्या केकपासून ते मिठाईचे बॉक्स, स्नॅक पॅकेट्स, टेकअवे फूड पार्सल आणि इतर खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंगसाठी धातूच्या पिन आणि तारेचा वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
नियामक संस्थेच्या म्हणण्यानुसार, केक आणि खाद्यपदार्थांच्या पॅकेटमध्ये धातूचे तुकडे किंवा स्टेपल पिन आढळल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशा प्रकारांमुळे ग्राहकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होतो. अन्नासोबत नकळत या धातूच्या वस्तू गिळल्या गेल्यास जखम होण्याची किंवा आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.
एफएसएसएआयने सर्व खाद्य व्यवसाय संचालकांना निर्देश दिले आहेत की, कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ, बेकरी उत्पादने, टेकअवे जेवण, स्नॅक पॅकेट्स किंवा फूड पार्सल सील करण्यासाठी, जोडण्यासाठी किंवा सुरक्षित ठेवण्यासाठी धातूच्या पिन, तारा किंवा तत्सम साहित्याचा वापर तात्काळ थांबवावा. तसेच, या निर्देशांचे पालन न करणाऱ्या खाद्य व्यवसाय संचालकांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
हे ही वाचा:
AN-32 विमान अपघातात हवाई दलाचे पाच जवान हुतात्मा
आधी अंतरिम करार लागू होईल, त्यानंतर अणुकार्यक्रमावर चर्चा!
रिलायन्स अनिल अंबानी समूहाच्या दोन माजी अधिकाऱ्यांना अटक
आसामच्या जोरहाटमध्ये भारतीय हवाई दलाच्या AN-32 विमानाचा अपघात
एफएसएसएआयच्या सल्लागार सूचनेनुसार, या आदेशाचे पालन न केल्यास ‘फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अॅक्ट, २००६’ आणि त्याअंतर्गत तयार करण्यात आलेल्या नियमांनुसार दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. या निर्णयाचा उद्देश अन्नसुरक्षेचे मानक अधिक मजबूत करणे आणि खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंग व हाताळणीदरम्यान धातूच्या वस्तूंच्या वापरामुळे ग्राहकांना होणारे अनावश्यक धोके टाळणे हा आहे.
