बीसीसीआयने प्रसिद्ध आसामी गायक झुबीन गर्ग यांना विशेष श्रद्धांजली वाहण्याचा निर्णय घेतला आहे. झुबीन गर्ग यांचे नुकतेच सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग अपघातात निधन झाले. ३० सप्टेंबर रोजी गुवाहाटी येथे होणाऱ्या महिला विश्वचषक २०२५ च्या उद्घाटन समारंभात त्यांच्या सन्मानार्थ श्रद्धांजली वाहण्याचे आयोजन केले जाणार आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया म्हणाले की, झुबीन गर्ग यांच्या निधनाने आसामला खूप दुःख झाले आहे. ते आदरास पात्र आहेत. म्हणूनच आसाम क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआयने उद्घाटन समारंभात त्यांच्यासाठी श्रद्धांजली वाहण्याचे आयोजन केले आहे. क्रिकेट जगतातून ही त्यांना आमची सर्वात मोठी श्रद्धांजली असेल.
सैकिया म्हणाले की, उद्घाटन समारंभात झुबीन गर्ग यांना समर्पित ४० मिनिटांचा विशेष कार्यक्रम असेल. यासोबतच प्रसिद्ध बॉलिवूड गायिका श्रेया घोषाल त्यांची लोकप्रिय गाणी आणि स्पर्धेचे अधिकृत गाणे, ब्रिंग इट होम, सादर करतील. दरम्यान, आयसीसी महिला विश्वचषक २०२५ चा उद्घाटन सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे. महिला विश्वचषक २०२५ भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आयोजित करणार आहेत. या स्पर्धेबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत कारण भारतीय संघाला घरच्या मैदानावर विश्वचषक जिंकण्याची उत्तम संधी मिळणार आहे.
बीसीसीआयचे सचिव सैकिया यांनी आशा व्यक्त केली की भारतीय महिला क्रिकेट संघ यावेळी आयसीसी विश्वचषक विजेतेपद जिंकून इतिहास रचेल. त्यांनी सांगितले की, “ऑस्ट्रेलियाविरुद्ध अलीकडे झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने उत्कृष्ट कामगिरी केली. जरी भारताला ही मालिका १-२ ने गमवावी लागली, तरीही संघाने आपली ताकद सिद्ध केली आहे. ऑस्ट्रेलिया हा एक अत्यंत मजबूत संघ आहे, परंतु आता भारत त्यांच्या खूपच जवळ आला आहे.”
हे ही वाचा :
मसूरीत भूस्खलनामुळे काय होतंय बघा..
पाकिस्तानने स्वतःच्या भूमीवरचं टाकले बॉम्ब! ३० सामान्य नागरिक ठार
सैकिया पुढे म्हणाले की, “भारतीय महिला संघाने अद्याप आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही, त्यामुळे हा विश्वचषक एक मोठी संधी आहे. इंग्लंडमध्येही संघाने चांगली कामगिरी केली असून, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.” त्यांनी असेही नमूद केले की, “महिला क्रिकेट आता नव्या उंचीवर पोहोचले आहे आणि यावेळी टीम इंडिया विश्वचषकात निश्चितच चमकदार कामगिरी करेल,” असा त्यांना ठाम विश्वास आहे.







