देशात कोविडच्या दुसऱ्या लाटेचा कहर चालला आहे. त्याबरोबरच लसीकरण मोहीम देखील मोठ्या प्रमाणात चालू आहे. मात्र यापूर्वी लसीकरणाबाबत काही नियम निश्चित करण्यात आले होते. आता त्यात काही प्रमाणात बदल केले आहेत. त्यामुळे अनेकांना लस देता येणार आहे. सरकारने विशेषतः स्तनदा मातांना देखील लस देण्यास परवानगी दिल्यामुळे अशा मातांना देखील दिलासा मिळाला आहे. त्याच बरोबर लस घेतल्यानंतर अथवा कोविडमधून बरे झाल्यानंतर करायच्या रक्तदानाच्या नियमांत देखील बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे रक्तदान करणाऱ्यांची संख्या वाढण्यास सहाय्य होणार आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नव्या नियमांनुसार लस घेतल्यानंतर १४ दिवसांत अथवा कोविड झालेला असल्यास आरटीपीसीआर चाचणी निगेटीव्ह आल्यानंतर एखादा व्यक्ती रक्तदान करू शकतो. त्याबरोबरच स्तनदा मातांना देखील लस घेण्यास कोणतीही अडचण नसल्याचं देखील मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांचे अँटिजेन चाचणी देखील आवश्यक नसल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा:
मोदींनी गुजरातला तौक्ते नंतर १ हजार कोटींची मदत केली जाहीर
क्रीडामंत्री किरण रिजिजू का रागावले?
पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय मागे
आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारच्या मंत्र्यांमध्येच जुंपली
कोविड रुग्णांसाठी देखील लसीकरणाचे नियम बदलण्यात आले आहेत. एनईजीव्हीएसीने (नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन ॲडमिनिस्ट्रेशन) देखील कोविड-१९ मधून बऱ्या झालेल्या रुग्णांना ३ महिन्यांनी लस देण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे एखाद्यास कोविड झाला असेल, तरी त्याला त्यातून बरे झाल्यानंतर ३ महिन्यांनी लस घेता येणार आहे. त्याबरोबरच जर एखाद्या व्यक्तीला पहिल्या मात्रेनंतर कोविडची लागण झाली, तर त्याला देखील कोविड-१९ मधून पूर्ण बरे झाल्यानंतर ३ महिन्यांनी लस मिळणार आहे. जर दुसऱ्या एखाद्या आजारामुळे एखादी व्यक्ती रुग्णालयात दाखल झाली असेल अथवा आयसीयूमध्ये दाखल झाली असेल, तर त्या व्यक्तीला ४ ते ८ आठवड्याच्या मुदतीनंतर लस घेता येणार आहे.