३० जून रोजी चेंबूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसादरम्यान शालेय बसवर झाड पडून ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. या घटनेची चौकशी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने (BMC) तीन सदस्यांची समिती नेमली होती. या समितीने महापालिकेच्या रस्ते आणि उद्यान विभागांना दोषमुक्त ठरवले. मात्र, घटनास्थळाजवळील पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या वाहिन्यांच्या कामात निष्काळजीपणा केल्याबद्दल कंत्राटदार आणि सल्लागारावर एकत्रितपणे ७ लाख रुपयांचा दंड आकारण्याची शिफारस केली.
समितीने म्हटले की, झाड पडण्यामागे अनेक घटक कारणीभूत असू शकतात. तरीही कंत्राटदार ‘गवार कन्स्ट्रक्शन लिमिटेड’ने खोदकामादरम्यान झाडाचे नुकसान होऊ नये म्हणून पुरेसी खबरदारी घेतली नाही आणि पर्यवेक्षक ‘महिमतुरा कन्सल्टंट्स’ने अधिक बारकाईने देखरेख करायला हवी होती. मात्र, या दुर्घटनेसाठी केवळ कंत्राटदारालाच जबाबदार धरले नाही, कारण आठ दिवसांच्या कालावधीत मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे १,००० हून अधिक झाडे पडली होती.
हे ही वाचा:
उंबरविहीरची तहान भागली; २४९ कुटुंबांना वर्षभर शुद्ध पाणी
लंडनमध्ये मंदिराची जमीन विकली मशिदीला
मध्यपूर्वेत युद्धाची धग वाढली, अमेरिकेला इराणचे चोख प्रत्युत्तर
प्रसूतीनंतर १८ महिलांचा मृत्यू; सात जणी डायलिसिसवर
अहवालात नमूद केले आहे की, उद्यान विभागाने वेळोवेळी झाडाची पाहणी केली होती, जिथे आवश्यक होते तिथे पावसाळ्यापूर्वी झाडाच्या फांद्यांची छाटणी केली होती आणि पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या वाहिन्यांच्या कामादरम्यान झाडाचे रक्षण करण्याबाबत रस्ते विभागाला अनेकदा सूचित केले होते. समितीने नमूद केले की, रस्ते विभागाने झाडाच्या मुळांना धक्का लागू नये म्हणून वाहिन्यांच्या मार्गात (अलाइनमेंटमध्ये) बदल केला होता आणि कंत्राटदाराला खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. ३० जून रोजी चेंबूरमध्ये सतत पडणाऱ्या पावसात रस्त्याच्या कडेला असलेले पिंपळाचे झाड शालेय बसवर कोसळल्याने विहान श्रीवास्तव या ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आणि इतर चार मुले जखमी झाली होती.
उप-महानगरपालिका आयुक्त पुरुषोत्तम मालवडे आणि शशांक भोरे, तसेच उद्यानविद्या आणि लँडस्केप सल्लागार रॉबर्ट फर्नांडिस यांचा समावेश असलेल्या या समितीने, पुरेशी खबरदारी न घेतल्याबद्दल प्रकल्पाच्या कंत्राटदारावर ५ लाख रुपये आणि पर्यवेक्षकावर २ लाख रुपयांचा दंड आकारण्याचा प्रस्ताव दिला आहे. समितीच्या अहवालानुसार, २८ जून ते ५ जुलै या कालावधीत अतिवृष्टी आणि वाऱ्याच्या काळात मुंबईभर १,१५८ झाडे आणि फांद्या पडल्या होत्या. चेंबूर येथील घटनास्थळी २८ जून रोजी ६२.८ मिमी, २९ जून रोजी ७१.६ मिमी आणि ३० जून रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत (जेव्हा झाड पडले) १३.६ मिमी पाऊस झाला होता, तसेच वाऱ्याचा वेग २५.७ किमी/तास इतका होता, असेही त्यात नमूद केले आहे.
प्रस्ताव मांडला
दंड आकारण्याच्या शिफारशीव्यतिरिक्त, समितीने शहरी वृक्ष व्यवस्थापनात व्यापक सुधारणा करण्याचा प्रस्तावही मांडला आहे. यामध्ये झाडांची तपासणी, देखभाल, छाटणी आणि सुरक्षा तपासणीसाठी धोरणांवर आधारित प्रमाणित कार्यपद्धती तयार करणे, छाटणी आणि पायाभूत सुविधांच्या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी नोंदणीकृत वृक्षतज्ञांची नियुक्ती करणे, आणि प्रत्येक पावसाळ्यापूर्वी व नंतर झाडांच्या जोखमीचे नियतकालिक मूल्यांकन करणे यांचा समावेश आहे. इतर शिफारसींमध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या सर्व झाडांची जीआयएस-आधारित सूची तयार करणे, झाडांच्या बुंध्याभोवती होणारे अतिरिक्त काँक्रिटीकरण कमी करणे, खोदकामादरम्यान झाडांच्या मुळांचे शास्त्रीय पद्धतीने संरक्षण करणे, मुळांजवळ अर्थमूव्हरसारख्या अवजड यंत्रसामग्रीच्या वापरावर बंदी घालणे, पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांदरम्यान नागरी विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे, आणि मुसळधार पाऊस किंवा वादळानंतर पूर्ण वाढ झालेल्या झाडांची तात्काळ तपासणी करणे यांचा समावेश आहे.
समितीने शहरी रस्त्यांसाठी योग्य असलेल्या स्थानिक झाडांच्या प्रजातींना प्रोत्साहन देण्याची, पॅनेलवरील तज्ञांमार्फत खाजगी गृहनिर्माण सोसायट्यांमधील झाडांची तपासणी सुरू करण्याची, आणि संभाव्य धोकादायक झाडे ओळखण्यासाठी मोबाईल रिपोर्टिंग यंत्रणेच्या साहाय्याने नागरिकांच्या पुढाकाराने ‘वृक्षमित्र’ उपक्रम सुरू करण्याची शिफारस देखील केली.







