भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवार, ८ मे रोजी पाकिस्तानला भारताच्या संयमाची परीक्षा न घेण्याचा इशारा दिला आहे. आमच्या संयमाची परीक्षा घ्याल तर त्याचे चोख प्रत्युत्तर दिले जाईल आणि त्यासाठी भारत तयार असल्याचा इशारा राजनाथ सिंह यांनी दिला आहे. भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने भारतातील १५ लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारताने हे सर्व हल्ले हाणून पाडले असून पाकिस्तानच्या प्रमुख शहरांवर ड्रोन हल्ले केले. यानंतर राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला कठोर शब्दात इशारा दिला आहे.
राजनाथ सिंह म्हणाले की, “आम्ही नेहमीच एका जबाबदार राष्ट्रासारखे अतिशय संयमाने वागलो आहोत. आम्ही संवादाद्वारे समस्या सोडवण्यावर विश्वास ठेवतो. परंतु याचा अर्थ असा नाही की कोणीही आमच्या संयमाचा गैरवापर करू शकेल,” असे सिंग म्हणाले. जर आमच्या संयामचा कोणी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी आमच्या दर्जेदार प्रतिसादाला तोंड देण्यास तयार असले पाहिजे, असा इशाराही राजनाथ सिंह यांनी दिला आहे.
पुढे राजनाथ सिंह म्हणाले की, “आपल्या सशस्त्र दलांनी दाखवलेल्या शौर्य आणि धाडसाबद्दल त्यांचे अभिनंदन. त्यांनी पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांचा नाश ज्या पद्धतीने केला तो आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे,” असे संरक्षणमंत्र्यांनी म्हटले. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले आणि मोठ्या संख्येने दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यावेळी नागरी संरचना आणि लष्करी ठिकाणांना भारताने लक्ष्य केले नव्हते.
हे ही वाचा :
भारताच्या ड्रोन हल्ल्यात लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त!
भारतातील १५ शहरांवर हल्ले करण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न हाणून पाडले! सगळी क्षेपणास्त्रे केली निष्प्रभ
गृहमंत्री अमित शाह यांचा झारखंड दौरा रद्द
पंतप्रधानांनी सचिवांसोबत घेतली उच्चस्तरीय बैठक
‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देण्यासाठी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये भारताने आपल्या कारवाईला केंद्रित, मोजकी आणि संघर्ष न वाढवणारी कारवाई असल्याचे म्हटले. यानंतर मात्र, पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, असा उघड इशाराही देण्यात आला होता. भारताने दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून ७ मे आणि ८ मे २०२५ च्या रात्री, पाकिस्तानने अवंतिपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज येथील लष्करी ठिकाणांना लक्ष्य करत ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ल्याचा प्रयत्न केला. हे सर्व हल्ले निष्प्रभ करण्यात आले. यानंतर दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे गुरुवारी सकाळी, भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील अनेक ठिकाणी हवाई संरक्षण रडार आणि यंत्रणा लक्ष्य केल्या. भारताची ही कारवाई त्याच क्षेत्रात आणि त्याच तीव्रतेने करण्यात आली जशी पाकिस्तानने केली होती.