मुंबईकरांसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा धोकादायक पातळीपर्यंत घसरला असून आता केवळ १८ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मुंबईसह उपनगरांमध्ये पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः अप्पर वैतरणा धरणातील पाणीसाठा केवळ ५ टक्क्यांवर आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
मुंबई महानगरपालिकेला दररोज सुमारे ३,९०० दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. हे पाणी भातसा, तानसा, मोडक सागर, अप्पर वैतरणा, मिडल वैतरणा, विहार आणि तुळशी या सात धरणांमधून पुरवले जाते. मात्र यंदाच्या तीव्र उन्हाळ्यामुळे आणि अपेक्षेपेक्षा कमी पावसामुळे धरणांतील पाण्याची पातळी वेगाने घटत आहे. त्यामुळे प्रशासनाने पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
हे ही वाचा:
बकरी ईदनिमित्त सोसायट्यांत बकऱ्या, घाटकोपरमध्ये सोमय्यांनी दिली भेट
मिरा रोडनंतर आता दिंडोशीतील सोसायटीत उभारली बकऱ्यांची शेड
तेल बाजार अस्थिर; कच्चे तेल ९५ डॉलरच्या जवळ
बायजू रवींद्रनला सिंगापूर न्यायालयाने ठोठावली ६ महिन्यांची शिक्षा
अप्पर वैतरणा धरणाची परिस्थिती सर्वाधिक गंभीर मानली जात आहे. या धरणातील साठा तळाला गेल्याने भविष्यातील पाणीपुरवठ्यावर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर तानसा, मोडक सागर आणि भातसा धरणांतील पाणीसाठाही झपाट्याने कमी होत असल्याने महापालिकेने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. आवश्यक असल्यास आणखी पाणी कपातीचा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, मुंबई महानगरपालिकेने आधीच १० टक्के पाणी कपात लागू केली आहे. ही कपात केवळ मुंबईपुरती मर्यादित नसून ठाणे, भिवंडी-निजामपूर आणि महानगरपालिकेकडून पाणी घेणाऱ्या काही परिसरांनाही लागू करण्यात आली आहे. वाढते तापमान, उशिरा येणारा मान्सून आणि एल निनोचा संभाव्य प्रभाव यामुळे यंदा परिस्थिती अधिक गंभीर बनण्याची भीती व्यक्त होत आहे.
राज्य सरकारनेही या परिस्थितीची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपलब्ध पाण्याचा वापर अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत अनावश्यक वापर टाळण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. नागरिकांनी वाहन धुणे, पाईपने पाणी वाया घालवणे, बागांना अति पाणी देणे यांसारख्या गोष्टी टाळाव्यात, असे आवाहनही करण्यात आले आहे.
मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीसाठी घटता पाणीसाठा हा मोठा इशारा मानला जात आहे. आता सर्वांच्या नजरा मान्सूनकडे लागल्या असून, पावसाचे आगमन लांबल्यास मुंबईकरांना आणखी कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते.
