काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचे महात्म्य कळाले आहे की काय, असा विचार मनात येण्यासारखे वक्तव्य त्यांनी केले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सावरकर हे क्रांतिकारक होते, त्यांनी १८५७चे स्वातंत्र्यसमर यावर पुस्तक लिहिले. प्रथम ते शिपायांचे बंड म्हणून पाहिले जात होते, पण सावरकरांनी ते स्वातंत्र्यसमर असल्याचे दाखवून दिले. त्यातून इंग्रजांचा त्यांच्यावर राग होता, असे चव्हाण म्हणाले.
चव्हाणांनी असेही सांगितले की, इंदिरा गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर स्टॅम्पही काढला होता. त्यांचे मोठेपण इंदिरा गांधी यांना माहीत होते, म्हणूनच त्यांनी स्टॅम्प काढला असणार. त्यांनी जहाजातून समुद्रात उडी मारली. त्यांना अंदमानला काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यासाठी ठेवण्यात आले होते. तिथे ते १० वर्षे तुरुंगात होते. ही शिक्षा अत्यंत क्रूर पद्धतीची शिक्षा होती.
पृथ्वीराज चव्हाण यांनी हे वक्तव्य केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात राहुल गांधी यांची पदयात्रा सुरू असताना त्यांनी सावरकरांची बदनामी केली होती. ते कसे इंग्रजांचे नोकर होते, अशा स्वरूपात राहुल गांधी यांनी सावरकरांना बदनाम केले. त्यामुळे पृथ्वीराज यांच्या या वक्तव्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
हे ही वाचा:
आव्हाडांना भीती सीबीआयच्या तपासाचा ससेमिरा मागे लागण्याची
आठ तासांची फिल्डिंग आणि चोर आले ताब्यात
विक्रम गोखले यांच्या प्रकृतीला आराम पडतोय!
श्रद्धा वालकर प्रकरणातील लव्ह जिहाद अंँगलबद्दल काय बोलल्या स्मृति इराणी
काँग्रेसकडून नित्यनियमाने सावरकरांवर अश्लाघ्य भाषेत टीका केली जात असते. त्यांचा वारंवार अपमान केला जात असतो. पण पृथ्वीराज चव्हाण यांना ही कशी काय उपरती झाली असाही प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे. एकीकडे राहुल गांधी आपण सावरकर नाही, गांधी आहोत, असा दावा करत असतात, त्याच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मात्र सावरकरांची स्तुती करतात, याविषयी लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
यानिमित्ताने अशीही चर्चा आहे की, पृथ्वीराज चव्हाण यांची राजकारणातली उपयुक्तता आता संपल्यामुळेच त्यांना ही उपरती झाली आहे का? काँग्रेसमधील अनेक नेते हे हळूहळू उपयुक्तता संपल्यानंतर काँग्रेसवरच प्रहार करताना दिसले किंवा सौम्य प्रतिक्रिया देताना दिसले. अर्थात, पृथ्वीराज चव्हाण यांनी तोंडी लावायला म्हणून सावरकरांच्या माफीनाम्याच्या विषयालाही छेडले. पण ते करताना त्यांनी सावरकरांचा त्यागही मान्य केला.