विदर्भाच्या नंदनवनावर पाणीटंचाईचे संकट

चिखलदऱ्यात सरासरीपेक्षा ४३ टक्के कमी पाऊस

विदर्भाच्या नंदनवनावर पाणीटंचाईचे संकट

विदर्भातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आणि ‘विदर्भाचे नंदनवन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदऱ्यावर यंदाच्या अपुऱ्या पावसाचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. पावसाळा सुरू होऊन ५० दिवसांहून अधिक काळ उलटूनही अपेक्षित पाऊस न झाल्याने चिखलदऱ्यात सरासरीपेक्षा तब्बल ४३ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. परिणामी, जलस्रोतांतील पाणीसाठा धोकादायकरीत्या घटला असून शहरात आता दोन दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.

चिखलदरा शहरातील सुमारे ९१८ नळजोडण्यांना प्रामुख्याने सक्कर तलावातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, यंदा अपुऱ्या पावसामुळे या तलावात केवळ पाच फूट पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आतापासूनच खबरदारीचा उपाय म्हणून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे.

२२ जुलैपर्यंत चिखलदरा तालुक्यात सरासरी ५०८ मिमी पावसाची अपेक्षा असताना प्रत्यक्षात केवळ २८७.२ मिमी म्हणजेच अवघा ५६.५ टक्के पाऊस झाला आहे. तालुक्यातील अनेक भागांत परिस्थिती आणखी गंभीर असून चुरणी येथे २०१.५ मिमी, तर गोलखेडा बाजार परिसरात केवळ १९७.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे संपूर्ण परिसरातील जलस्रोतांवर मोठा ताण निर्माण झाला आहे.
हे ही वाचा:
जंतर मंतरवरुन परतणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना मारहाण

आता पंजाबच्या शिक्षणमंत्र्याचा हवाय राजीनामा!

अभिजितने राजकारण नव्हे, करिअरकडे लक्ष द्यावं!

गोव्यात ‘फ्री उमर खालिद’ फलक दाखवणारा ताब्यात

साधारणपणे पावसाळा सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच चिखलदऱ्यातील तलाव भरू लागतात आणि पाणीपुरवठा सुरळीत होतो. मात्र, यंदा पावसाने दडी मारल्याने ही परिस्थिती बदलली आहे. विशेष म्हणजे सध्या पर्यटन हंगाम असल्याने मोठ्या प्रमाणावर पर्यटक चिखलदऱ्यात दाखल होत आहेत. त्यामुळे पाण्याची मागणी वाढली असून उपलब्ध साठ्यावर अतिरिक्त ताण पडत आहे.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भात २९ जुलैपर्यंत पावसाला काहीसा ब्रेक मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच कमी असलेल्या जलसाठ्याबाबत प्रशासनाची चिंता आणखी वाढली असून शेतकरी आणि नागरिकांना पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन केले जात आहे.

Exit mobile version