भारतीय विकेटकीपर-बॅट्समन संजू सॅमसनला सुरुवातीला आयपीएस अधिकारी बनायचं स्वप्न होतं. पण वडिलांच्या इच्छेला मान देत त्याने क्रिकेट हा मार्ग निवडला — आणि आज तो भारतीय क्रिकेटमधील सर्वात प्रतिभावान खेळाडूंमध्ये गणला जातो.
११ नोव्हेंबर १९९४ रोजी तिरुअनंतपुरम येथे जन्मलेला संजू, दिल्ली पोलिसांमध्ये कॉन्स्टेबल असलेल्या सॅमसन विश्वनाथ यांचा मुलगा आहे. वडिलांना खाकी गणवेशात पाहून संजूनेही अधिकारी बनायचं ठरवलं होतं. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं.
संजू आपल्या वडिलांसोबत दिल्लीतील किंग्सवे कॅम्प भागात राहत होता. तिथे तो इतर मुलांप्रमाणे गल्लीत क्रिकेट खेळायचा. एकदा रस्त्यावर खेळताना तो बोल्ड झाला. वडिलांनी विचारलं — “कसा बोल्ड झालास?” संजू म्हणाला — “बॉल रस्त्यावरील खड्ड्याला लागून खालीच राहिला.”
दुसऱ्या दिवशी शाळेतून परतल्यावर संजूने पाहिलं — वडील स्वतःच्या हातांनी तो खड्डा भरत होते. हसत त्यांनी विचारलं — “आता बघ बेटा, खड्डा नाही ना?”
तीच ती भावना, जी नंतर संजूच्या क्रिकेट प्रवासाचा पाया ठरली.
वडिलांचे मित्र नेहमी म्हणायचे — “एवढं का कष्ट करतोयस, क्रिकेटर होणं सोपं नाही.” पण सॅमसन विश्वनाथ यांनी ठरवलं होतं की मुलाचं स्वप्न ते पूर्ण करणारच.
साल २००६ मध्ये जेव्हा संजूचा दिल्ली अंडर-१३ संघात निवड झाली नाही, तेव्हा वडिलांनी मोठा निर्णय घेतला — त्यांनी दिल्ली पोलिसांची नोकरी सोडली आणि संपूर्ण कुटुंबासह तिरुअनंतपुरमला परतले.
तेथूनच संजूच्या कडक क्रिकेट प्रशिक्षणाला सुरुवात झाली.
शेवटी त्यांची मेहनत फळाला आली —
२०११ मध्ये संजूने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केले, तर २०१३ मध्ये तो राजस्थान रॉयल्सकडून IPL खेळला. पहिल्याच हंगामात त्याने ११ सामन्यांत २०६ धावा केल्या आणि पुढच्या वर्षी त्याला ४ कोटींमध्ये रिटेन करण्यात आलं.
२०१५ मध्ये तो भारतीय टी२० संघात निवडला गेला. पहिल्या सामन्यात त्याने १९ धावा केल्या, पण पुढचा सामना खेळण्यासाठी त्याला ५ वर्षे वाट पहावी लागली.
तरीही त्याने हार मानली नाही. IPL मध्ये सातत्याने उत्कृष्ट खेळ करत राहिला.
२०२१ मध्ये संजू सॅमसनने अखेर वनडे पदार्पण केलं.
आतापर्यंत त्याने १६ वनडे सामन्यांत ५१० धावा (सरासरी ५६.६६), आणि ५१ टी२० सामन्यांत ९९५ धावा (३ अर्धशतके, ३ शतके) केल्या आहेत.
त्याच्या फर्स्ट क्लास करिअरमध्ये ३,८८८ धावा, लिस्ट-ए मध्ये ३,४८७ धावा, आणि १७७ IPL सामन्यांत ४,७०४ धावा, ८६ कॅच, १७ स्टंपआउट्स अशी प्रभावी कामगिरी आहे.
एक काळ होता, जेव्हा तो आयपीएस अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहायचा,
आणि आज तो भारतीय क्रिकेटचा “रॉयल सॅमसन” म्हणून ओळखला जातो.







