कराचीत अलीकडे झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानने भारतावर केलेले आरोप भारताने फेटाळून लावत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भारताने हे आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे सांगत पाकिस्तानने स्वतःच्या भूमीवर कार्यरत असलेल्या दहशतवादी यंत्रणेचा नायनाट करण्यावर लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला दिला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इतरांवर बोट दाखवण्याऐवजी पाकिस्तानने स्वतःचा चेहरा आधी आरशात पाहावा. पाकिस्तानच्या आरोपांबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना अधिकृत प्रवक्ते रणधीर जायसवाल म्हणाले, “कराचीतील अलीकडील घटनेबाबत भारतावर पाकिस्तानने केलेल्या आरोपांच्या बातम्या आम्ही पाहिल्या आहेत. आम्ही हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावतो.”
ते पुढे म्हणाले, “इतरांवर दोषारोप करण्याऐवजी पाकिस्तानने स्वतःच्या भूमीवर कार्यरत असलेल्या दहशतवादी नेटवर्कविरोधात ठोस आणि विश्वासार्ह कारवाई करावी तसेच दहशतवादाचा राज्याच्या धोरणाचे साधन म्हणून वापर करण्याची प्रवृत्ती कायमची थांबवावी.”
दरम्यान, पाकिस्तानातील कराची येथे पाकिस्तान रेंजर्स (सिंध)च्या गुलिस्तान-ए-जौहर छावणीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तीन सुरक्षा जवानांचा मृत्यू झाला असून, तीन सशस्त्र हल्लेखोर ठार झाले आहेत. तसेच एक जखमी हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील काही माध्यमांनी भारताला जबाबदार ठरवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया देत हे सर्व दावे पूर्णपणे निराधार असल्याचे स्पष्ट केले.
हे ही वाचा:
पाकिस्तानचे मेजर इक्बाल झोपलेत काय?
दारिद्र्याचा घाला… एकाच कुटुंबातील ४ जणांची आत्नहत्या
रोइंगमध्ये भारताला पहिले जागतिक सुवर्णपदक
लिओनेल मेस्सीचा विश्वचषकात ऐतिहासिक पराक्रम
दरम्यान, पाकिस्तानी लष्कराच्या माध्यम विभाग इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (आयएसपीआर)ने रविवारी जारी केलेल्या निवेदनात दावा केला की, हा हल्ला जमात-उल-अहरारशी संबंधित दहशतवाद्यांनी केला होता. आयएसपीआरच्या माहितीनुसार, सशस्त्र हल्लेखोरांनी प्रथम छावणीच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्फोट घडवून आणला आणि त्यानंतर परिसरात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, रेंजर्सच्या जवानांनी तत्परतेने प्रत्युत्तर देत त्यांचा प्रयत्न हाणून पाडला.
जमात-उल-अहरार हा पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आलेल्या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या संघटनेपासून वेगळा झालेला गट आहे.







