29 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरविशेषसर विश्वेश्वरय्यांनी अचानक रेल्वेची साखळी खेचली आणि सगळ्यांनाच धक्का बसला

सर विश्वेश्वरय्यांनी अचानक रेल्वेची साखळी खेचली आणि सगळ्यांनाच धक्का बसला

भारतातील प्रसिद्ध स्थापत्य अभियंते सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची आज म्हणजेच १५ सप्टेंबर या दिवशी जयंती.

Google News Follow

Related

भारतातील प्रसिद्ध स्थापत्य अभियंते सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची आज म्हणजेच १५ सप्टेंबर या दिवशी जयंती. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्म कर्नाटकातील कोलार जिल्ह्यात चिक्कबल्लापूर तालुक्यातील मुद्देनहळ्ळी येथे झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव पंडित श्रीनिवासशास्त्री आणि आईचे नाव व्यंकचम्मा होते. विश्वेश्वरय्या हे अत्यंत चाणाक्ष बुद्धीचे आणि प्रचंड ज्ञानी होते.

विश्वेश्वरय्या यांच्या बुद्धीचे दर्शन घडेल असा एक किस्सा घडला होता. विश्वेश्वरय्या हे एकदा रेल्वेने प्रवास करत होते. रेल्वे गाडीत गर्दी होती. लोकांची गडबड, गप्पा सुरू होत्या. मात्र, विश्वेश्वरय्या हे त्यांच्या जागेवर शांत डोळे बंद करून बसले होते. त्यांना झोप लागली असावी असेच सर्व प्रवाशांना वाटत असताना अचानक विश्वेश्वरय्या आपल्या जागेवरून उठले आणि त्यांनी रेल्वे गाडीची आपत्कालीन साखळी खेचली.

या व्यक्तीने झोपेत साखळी खेचली की काय असा अंदाज लावून इतर प्रवासी विश्वेश्वरय्या यांच्याशी वाद घालू लागले. काही वेळातच रेल्वे कर्मचारी साखळी कोणी आणि का खेचली हे पाहण्यासाठी विश्वेश्वरय्या यांच्याजवळ पोहचले. त्यांनीही विश्वेश्वरय्या यांना साखळी खेचण्याचे कारण विचारले. त्यावेळी अगदी आत्मविश्वासाने विश्वेश्वरय्या यांनी सांगितले की, इथून १.५ किलोमीटर पुढे रेल्वे रुळाच्या काही पट्ट्या उखडल्या गेल्या आहेत. त्यामुळे रेल्वे जर पुढे गेली तर मोठा अपघात होऊ शकतो.

विश्वेश्वरय्या यांच्या उत्तरावर लोकांमध्ये कुजबुज सुरू झाली. त्यांच्यावर विश्वास ठेवायला कोणीही तयार नव्हतं. मात्र, विश्वेश्वरय्या यांचा आत्मविश्वास बघून रेल्वे कर्मचाऱ्यांनी पुढे जाऊन तपासणी करण्याचा निर्णय घेतला. हे कर्मचारी जेव्हा पुढे खरंच चालत गेले तेव्हा तिथे काही रुळाच्या पट्ट्या उखडलेल्या त्यांनी पाहिल्या.

रेल्वे कर्मचाऱ्यांनी जेव्हा पुन्हा येऊन थक्क होऊन विश्वेश्वरय्या यांना तुम्हाला कसं कळलं असं विचारलं तेव्हा विश्वेश्वरय्या यांनी सांगितलं की, रेल्वे ज्या वेगाने जात होती आणि त्यामुळे जो पटरीचा आवाज येत होता त्यात अचानक बदल झाला. पुढे पट्ट्या उखडल्या गेल्यात म्हणूनच हा बदल झाला आणि माझ्या लक्षात येताच मी रेल्वेची आपत्कालीन साखळी खेचली. त्या दिवशी विश्वेश्वरय्या यांनी अनेक सहप्रवाशांचे प्राण वाचवले. त्यासाठी विश्वेश्वरय्या यांचे सर्व स्तरांमधून कौतुक देखील करण्यात आले.

अभियंते सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जीवनप्रवास

विश्वेश्वरय्या यांचे प्राथमिक शिक्षण चिक्कबल्लापूरमध्ये झाले तर उच्च शिक्षण बंगलोरच्या सेंट्रल कॉलेजमध्ये झाले. १८८३ मध्ये ते अभियांत्रिकीची पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. १८८४ मध्ये मुंबई सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात विश्वेश्वरय्या यांची सहाय्यक अभियंता म्हणून नियुक्ती झाली.

अनेक विकास कामांमध्ये त्यांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे. १९५५ साली भारत सरकारने त्यांना सर्वोच्च सन्मान ‘भारतरत्‍न’ देऊन गौरवले. त्यांच्या सन्मानाप्रीत्यर्थ पोस्टाचे तिकीट काढले. त्यांचा जन्मदिन ‘अभियंता दिन’ म्हणून भारतभर साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फेही १९९८ पासून त्यांचा जन्मदिन ‘अभियंता दिन’ म्हणून साजरा करण्याचे घोषित करण्यात आले. बंगळुरू येथे १४ एप्रिल १९६२ रोजी वयाच्या १०१ व्या वर्षी विश्वेश्वरय्या यांनी अखेरचा श्वास घेतला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा