31 C
Mumbai
Wednesday, May 15, 2024
घरविशेषएल्फिन्स्टनचा उड्डाणपूल मराठी माणूस होणार का गुल?

एल्फिन्स्टनचा उड्डाणपूल मराठी माणूस होणार का गुल?

Google News Follow

Related

वरळीवरून थेट शिवडी न्हावा शेवाला जोडणाऱ्या शिवडी वरळी कनेक्टर प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण उभारते आहे. वांद्रे, वरळी सागरी सेतूवरून थेट शिवडी न्हावा शेवा मार्गावर जाता यावे म्हणून वरळी, प्रभादेवी, परळ, भोईवाडा या परिसरातून नवा मार्ग तयार करण्यात येत आहे. मात्र हा मार्ग गिरणगावाच्या भरवस्तीतून जात आहे. या मार्गात येणाऱ्या इमारती आणि चाळी यातील रहिवाशांच्या मनात मात्र संभ्रम निर्माण झाला आहे. आमचे पुनर्वसन कधी होणार, कुठे होणार की आमच्या तोंडाला पाने पुसली जाणार अशा अनेक प्रश्नांचे काहूर त्यांच्या मनात माजले आहे. आमचे याच परिसरात पुनर्वसन करावे अशी स्थानिकांची जोरदार मागणी आहे. या चाळीत मराठी माणसाचा टक्का मोठा आहे. आपण मुंबईतच राहणार की मुंबई बाहेर फेकले जाणार अशा भीतीने त्यांना ग्रासले आहे.

परळ एसटी डेपोला लागून असेलला जगन्नाथ भातणकर मार्ग सप्टेंबर २०२३ पर्यंत बंद असणार आहे. एल्फिनस्टन सिग्नलपासून जिथे हा ब्रिज सुरू होतो तेथील १३ बिल्डिंग बाधित होता आहेत. या १३ बिल्डिंग सेस आहेत. या सेस बिल्डिंग असल्याने त्यांना झोपडपट्टीचे नियम लागू होत नाहीत. सेस बिल्डिंगच्या धोरणानुसार त्यांचे पुनर्वसन इथेच व्हायला हवे. त्यांना एसआरएचे नियम लागू होत नाहीत. त्यामुळे आमची इथेच रहाण्याची व्यवस्था करावी, अशी स्थानिकांची मागणी आहे. आमचा या प्रकल्पाला विरोध नाही परंतु आमचे पहिले पुनर्वसन करावे आणि पुढील कारवाई करावी, असा त्यांचा आग्रह आहे.

या मार्गातील बहुतेक इमारती १०० वर्षाहून जुन्या आहेत. उड्डाणपूलाच्या पीलरसाठी ड्रिलिंग सुरू आहे. या कामामुळे कोणत्या इमारतीला नुकसान झाले कोणती दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल स्थानिकांनी विचारला आहे. एमएमआरडीएला काही प्रश्न विचारले तर ते बीएमसीकडे बोट दाखवत आहेत. बीएमसीला काही प्रश्न विचारले तर ते एमएमआरडीएकडे बोट दाखवत आहेत. दोघांपैकी एकही जण ठामपणे काहीही सांगत नाहीयेत. एमएमआरडीएचे म्हणणे आहे की तुमचे पुनर्वसन आम्ही करणार नाही. तुमचे पुनर्वसन पालिका करणार.

इथे शंभर वर्षे जुन्या चाळी आहेत. तर काही म्हाडाच्या इमारती आहेत. आमचा या प्रोजेक्टला विरोध नाही. आम्हाला तुम्ही देशोधडीला लावू नका. आम्हाला रस्त्यावर आणू नका. आमचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करा, अशा भावना स्थानिकांनी व्यक्त केल्या आहेत. इथल्या २० वर्षापूर्वी अहमद मंजील इमारतीला धोकादायक दाखवून रहिवाशांना गोरेगाव, दहीसर इथल्या ट्रॅझिंट कॅम्पमध्ये पाठवले होते. अजूनही त्यांना हक्काची जागा मिळालेली नाही. आता तर त्या ट्रॅझिंट कॅम्पमधल्या घरालाच नोटीस लागली आहे. तुम्ही २० वर्षाहून जास्त इथे राहू शकत नाही. तुम्ही तात्काळ रूम खाली करा, अशी नोटीस लावली आहे. त्या लोकांनी काय करायचं? आता सांगा त्यांची पुनर्वसनाची जबाबदारी कोणाची होती, असे प्रश्न रहिवाशी विचारत आहेत.

या प्रकरणावरचा ‘न्यूज डंका’चा हा स्पेशल रिपोर्ताज- 

संत रोहिदास चौक ते धनमिल नाकापर्यंत जाणारा मार्ग बंद करून तिकडे काम सुरू केले आहे. त्याचा परिणाम इथल्या व्यापाऱ्यांवर होतोय. आम्ही इथे वर्षानुवर्षे व्यवसाय करतोय. आमच्यासाठी काय करणार आहेत. आमची तर रोजीरोटी बंद होणार आहे. दोन वर्षे कोरोनाकाळात भरपूर हाल काढलेत. आमची दुकानं बंद होती. घर आणि दुकानं इथे आहेत. आम्हाला दुकान-गाळे कुठे मिळणार. आमचा धंदा होईल अशा ठिकाणी आम्हाला गाळे मिळावेत अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे. पुनर्वसन पहिले मग विकास अशी जोरदार मागणी होते आहे.

कोणताही प्रकल्प सुरू करण्यापूर्वी त्या प्रकल्पामध्ये कोण बाधित होतेय हे बघितले जाते. त्याचा आराखडा बनवला जातो. तो आराखडा तयार झाल्यानंतर स्थानिकांशी त्याची चर्चा केली जाते. त्यांना विश्वासात घेऊन सर्व गोष्टी सांगितल्या जातात. असा कोणताही विषय इथे झालेला नाही, असे धनंजय यांनी सांगितले आहे.

एल्फिन्स्टन उड्डाणपूलाला पश्चिम आणि पूर्व अशा दोन बाजू आहेत. पश्चिमेला दक्षिण आणि उत्तर अशा बाजू आहेत. उत्तरेच्या सात बिल्डिंग बाधित तर दक्षिणेला सहा बिल्डिंग बाधित होता आहेत. ज्या बाधित बिल्डिंग आहेत त्या फक्त १२ फूटापर्यंतच बाधित आहेत. १२ फूट बाधित झाल्यानंतर जी मागील जागा उरते आहे ती एवढी मोठी जागा आहे की तिथेच आमचे पुनर्वसन होऊ शकते. जर बीएमसी पूनर्वसन करणार आणि विभागातच करणार आहे मग या जागेत आमचे पूनर्वसन का करत नाही आहे. म्हणजे आहे त्याच जागी पूनर्वसन होईल. पूनर्वसन होत असूनसुद्धआ त्याची नोंद घेतली जात नाही, अशी खंत रहिवासी व्यक्त करत आहेत.

जगन्नाथ भातणकर मार्ग येथील चाळी मात्र बाधित होत नाहीयेत. या चाळींच्या डोक्यावरून उड्डाणपूल जातोय. कमीतकमी ४० मीटर रुंद हा उड्डाणपूल असेल. त्याच्या खाली या चाळी येताहेत. शंभर वर्षापेक्षा जीर्ण झालेल्या एक मजली चाळी आहेत. समजा उड्डाणपूल झाल्यानंतर आम्हाला चाळीचे पुनर्वसन करायचे असेल तर आमचे काय होणार आम्ही त्या जागेत बिल्डिंगसुद्धा बांधू शकत नाही कारण वर उड्डाणपूल आहे तेव्हा काय करणार आणि भविष्यात विकासही होऊ शकत नाही, म्हणजे आम्ही देशोधडीला लागणार, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

नरेश महाकाल सांगतात, की आम्ही ब्रीज वायडनिंगमध्ये आहोत. एमएमआरडीए आल्याने १३० रिअल लाइनचे आता १६० झाले. ती वाढल्याने आमचा बिल्डिंगचा आणखी भाग गेला. त्याचा आम्हाला काहीही फायदा नाही आमची बिल्डिंग तुटणारच आहे. पूर्नवसनाबाबत काही कल्पना नाही. त्याच्याआधीच बाधीत झालोय. जनसुनावणी झाली त्यातही काही स्पष्ट सांगितलेली नाही.

हे ही वाचा:

मुंबईची बत्ती गुल

पंतप्रधान नरेंद्र मोदी, झेलेन्स्की यांच्यातील चर्चेनंतर भारताची ही भूमिका

‘मुंबई असुरक्षिततेच्या उंबरठ्यावर?’ या पुस्तिकेचे प्रकाशन

नारायण राणे, नितेश राणे यांच्यावर ठाकरे सरकारचा सूड

जगन्नाथ भातणकर या मार्गाचे काम झाल्यानंतर एल्फिन्स्टन उड्डाणपूलाचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम भर पावसाळ्यात हाती घेतले जाणार आहे. काही मिनीटाच्या पावसात दादरचा हिंदमाता मार्ग पाण्याखाली जातो. कोविड कमी होऊन आताच कुठे शाळा सुरू होताहेत. हा उड्डाणपूल बंद झाल्यावर पलीकडील सोशल सर्व्हिस, आरएम भट अशा अनेक शाळेत येथील विद्यार्थी शिकण्यासाठी जातात. तसेच केईएम, टाटा, वाडिया यासारखे हॉस्पिटलही या भागात आहेत. काही इमर्जन्सी झाली तर तिथे जाणार कसे? त्याची पर्यायी व्यवस्था काय? त्यासाठी लोअर परेलचा उड्डाणपूल जोपर्यंत वाहतुकीस खुला होत नाही तोपर्यंत हा पूल बंद करू नये अशी स्थानिकांची मागणी आहे.

एकूणच या सगळ्या विकासाकामात मराठी माणूस भरडला जाणार आहे. मराठी माणसासाठी गळे काढणारे  हाच मराठी माणूस या वस्तीतून हद्दपार होणार नाही याची काळजी घेणार आहेत का? की फक्त मराठी माणसाचा मतांसाठी उपयोग होणार आहे? लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. पण त्याची उत्तरे नाहीत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा