बोरिवली पूर्व येथील मागाठाणे मेट्रो रेल्वे स्टेशनच्या बाजूला आणि हायवेलगत असलेल्या मेट्रो मॉलच्या दरम्यान सुरू असलेल्या बांधकामाचा इथल्या पादचाऱ्यांना आणि आसपासच्या कार्यालयातील लोकांना प्रचंड त्रास होऊ लागला आहे. या बांधकाम साईटजवळ उभ्या राहणाऱ्या आणि तिथून ये-जा करणाऱ्या बिल्डरच्या ट्रक, मिक्सरमुळे रहदारीची प्रचंड कोंडी होत आहे. विशेष म्हणजे जवळच असलेल्या रुग्णालयातील रुग्णवाहिकांनाही या सगळ्या रहदारीमुळे मनस्ताप सहन करावा लागतो. त्याबद्दलही लोक संताप व्यक्त करत आहेत.
या बांधकामाच्या साईटवरून अनेक मोठमोठे ट्रक्स, मिक्सर या परिसरात चालत असतात. त्यामुळे या भागात रहदारीची प्रचंड कोंडी होत असून त्याचा त्रास लोकांना होत आहे. हे ट्रक, मिक्सर बांधकामाच्या ठिकाणाहून बाहेर येताना किंवा आत जाताना या गाड्या छोट्या रस्त्यावरून वळवल्या जातात त्यामुळे तिथे ही रहदारीची कोंडी होते.

मागाठाणे मेट्रो स्टेशन आणि मेट्रो मॉल यादरम्यान असलेल्या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी हे मोठमोठे ट्रक्स आणि मिक्सर पार्क केल्यामुळे या रस्त्यावर अन्य गाड्या चालवणेही मुश्कील होत असल्यामुळे लोकांचा संताप होत आहे.
यासंदर्भात वारंवार तक्रारीही लोकांनी केलेल्या आहेत. विशेष म्हणजे याच परिसरात असलेल्या अपेक्स हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकाही याच रस्त्याने जात असतात पण दोन्ही बाजूंनी पार्क असलेल्या या महाकाय गाड्यांमुळे रुग्णवाहिकांनाही कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याच्या घटना घडल्या आहेत.
हे ही वाचा:
युद्धाच्या सावटातही इराणची तेल निर्यात सुरू
“जाणूनबुजून तणाव निर्माण करणारी काँग्रेसची विधाने”
एलपीजी- एलएनजी पुरवठा स्थिरतेसाठी भारताकडून पर्यायी मार्गांचा अवलंब
होर्मुझ सामुद्रधुनीत किती भारतीय जहाजं अडकली?
ही सगळी परिस्थिती लक्षात घेता वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद तावडे यांनी याची दखल घेत सदर गाड्यांवर दंडात्मक कारवाई केली तसेच बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या संबंधितांना समजही दिली.

आता त्याठिकाणी गाड्या कुठे वळवता येणार नाहीत हे दर्शवणारा बोर्ड लावण्यात आला आहे. ट्रॅफिक पोलिसांनी याची दखल घेत या महाकाय गाड्यांवर कारवाई केली आहे.
पण कारवाई झाल्यानंतर काही काळ परिस्थिती निवळते मात्र नंतर पुन्हा एकदा या मोठमोठ्या गाड्या तिथे उभ्या असतात. त्यामुळे गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागतात आणि त्याचा त्रास प्रवाशांनाही होतो. या बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारांना यासंदर्भात समज देण्यात यावी आणि हे ट्रक्स, मालवाहतूक करणाऱ्या भल्यामोठ्या गाड्या, मिक्सर यांच्याकडून रहदारीची कोंडी झाली तर त्यावर कारवाई करण्यात येऊन त्यांच्यावर जरब बसवावी अशी लोकांची मागणी आहे.







